आधुनिक भारत घडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुल्य आत्मसात करणे गरजेचे – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने त्यांनी दिन-दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनात प्रगतीची पहाट उगविली. विविध क्षेत्रात स्वहीत न बघता देशहिताला प्राधान्य देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आपला वैभवशाली देश अखंडपणे उभा असून आपल्या देशाला जगात बलशाली, समृद्ध व आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांची मुल्य आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आ.आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते की, समाजामध्ये सामाजिक समता, सामाजिक न्याय, सामाजिक प्रतिनिधित्व, यांच्या द्वारे देशाची परिस्थिती मजबूत करणे, जल, विद्युत, उर्जा, कृषी यामध्ये देश संपन्न होईल यासाठी विविध योजना आखणे, नदीजोड प्रकल्प, हिंदु कोड बिलाच्या माध्यमातून महिलांच्या आत्मसन्मानाची लढाई, स्वतःच्या ज्ञानाचा फायदा देशासाठी बहाल करून रिझर्व्ह बँकेची स्थापना, एस.सी., एस. टी.,ओबिसी यांची माणुस म्हणून ओळख निर्माण करून वेगवेगळ्या क्षेत्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अजोड योगदान दिले आहे. 

वंचितांचे, महिलांचे, कामगारांचे कैवारी तर होते परंतु त्याचबरोबर अर्थतज्ञ, कृषितज्ञ, जलतज्ञ, उद्योगतज्ञ, कायदेतज्ञ, परराष्ट्र धोरणतज्ञ, पत्रकार, लेखक असे त्यांचे अष्टपैलू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी समता,स्वांतत्र्य, बंधुता, मानवता या अनमोल मुल्यांची समाजाला शिकवण देवून बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यभर लढा दिला. अस्पृश्यता निवारण, शेतकरी, महिलांच्या हक्कांसाठी अविरत कार्य केले. 

हिंदू कोड बिल आणून महिलांना चूल आणि मूल या जोखडातून बाहेर काढले. त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी दिली, अधिकार दिले, ओळख दिली. म्हणून आज आपल्या देशातील महिला एवढी प्रगती करू शकल्या आणि करत आहेत. आपला देश प्रगतीच्या शिखरावर घेवून जाण्याचे सर्वांचेच स्वप्न असून हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूल्य जोपासावी लागणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी भन्ते कश्यपजी, विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील गंगाधर फडे चौक, इंदिरापथ व बस स्थानक आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.