बिबट्याच्या हल्ल्यातील मयतांच्या वारसांना १० लाखांची मदत – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : मागील महिन्यात सोमवार (दि.१०) रोजी सकाळी ११.०० वा.सुमारास शेतात घास कापण्यासाठी गेलेल्या अंदाजे ६० वर्षीय शांताबाई अहिल्याजी निकोले यांचेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचे निधन झाले होते. सदर घटनेची माहिती समजताच आ.आशुतोष काळे वीसच मिनिटात घटनास्थळी दाखल झाले आणि घटना स्थळावरूनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भ्रमणध्वनीवरून घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली होती व मयत शांताबाई निकोले यांच्या वारसांना मदत मिळावी अशी मागणी केली होती.

त्या मागणीची दखल घेऊन व आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून वनविभागाकडून शांताबाई निकोले यांच्या वारसांना १० लाखाची मदत देण्यात आली असून या मदतीचा धनादेश नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मयत शांताबाई निकोले यांचे वारस त्यांचा मुलगा संतोष निकोले यांना देण्यात आला. याप्रसंगी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती व विद्यमान संचालक राजेंद्र निकोले उपस्थित होते.

राज्यात बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्याप्रमाणेच कोपरगाव मतदार संघात देखील बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांवर हल्ले होऊन शेतकऱ्यांचे पशुधनावर देखील हल्ले झाले होते. टाकळी परीसरात ऊस तोडणी मजुराच्या चार वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला होता. हि घटना ताजी असतांनाच सोमवार (दि.१०) रोजी सकाळी ११.००वा. सुमारास शेतात घास कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अंदाजे ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जवळपास एकाच आठवड्यात दोन निरपराध व्यक्ती बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यामुळे नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन नागरिकांची समजूत काढत घटना स्थळावरूनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भ्रमणध्वनीवरून घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती देवून आपण जातीने लक्ष घालावे व वन विभागाला योग्य त्या सूचना देवून बिबट्याच्या मृत्यू पावलेल्या मयतांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली होती.

त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भ्रमण ध्वनीवरच नागरिकांशी संवाद साधत आ.आशुतोष काळे यांनी दिलेली माहिती मला समजली असून याबाबत लवकरच योग्य ती कारवाई करून मयत व्यक्तीच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले होते. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरूच होता. त्या पाठपुराव्यातून वन विभागाने मयत शांताबाई निकोले यांना दहा लाखाचा धनादेश व ऊस तोडणी कामगारांच्या मुलीच्या कुटुंबाला दहा लाखाची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

Leave a Reply