जातपंचायत विरोधात लढणाऱ्या मनिषा अहिरे फुले पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ एप्रिल २०२६ : कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील अंनिसच्या कार्यकर्त्या व आरोग्यसेविका मनिषा अहिरे-अटक यांना महात्मा फुले जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . ओझर ( मिग), नाशिक येथे झालेल्या महात्मा फुले जयंतीच्या कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला. पत्रकार दीप्ती राऊत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, मानपत्र, शाल व रोपटे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने हा पुरस्कार समारंभ पार पडला.

   मनिषा या  दुर्लक्षित भटके विमुक्त समाजातील आहे. त्यांची अत्यंत गरिबीची परिस्थिती होती. म्हणून त्यांनी लोकांच्या घरी धुणे भांडीचे काम करून शिक्षण पूर्ण केले. सरकारी नोकरी मिळवणारी त्या त्यांच्या समाजातील पहिली महिला ठरल्या आहे. त्यांच्या अंगावर  लहानपनापासून कोड असल्याने त्यांना त्यांच्या समाजाकडून तिरस्काराची वागणूक भेटली. तशी स्त्री देवाला चालत नाही, अशा मुलीशी लग्न केले तर देवाचा श्राप होऊन परिवाराचे वाटोळे होते असा त्यांचा गैरसमज होता. समाजात त्यांच्या सोबत लग्न करायला कोणी तयार होत नव्हते. जात पंचायतीने त्यांना व आई वडिलांना सुद्धा जाती बहिष्कृत केले.

पुढे त्यांनी जातपंचायत विरोधात मोठा लढा उभारून त्यांनी समाजात प्रवेश मिळवला. पाच वर्षा पासून माहेरच्यांची भेट नव्हती. यावर्षी भावाच्या लग्नात जावून  त्यांनी बहिष्कार झुगारला. त्यांच्या प्रयत्नाने व अंनिसच्या पुढाकाराने चित्रकथी जातपंचायत बरखास्त झाली. बाल विवाह होऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामात सहभाग घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामे केली. या पुरस्कार वितरण प्रसंगी अंनिसचे कृष्णा चांदगुडे , नितीन पाटील, अमित जोजारे, चेतन अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply