शेवगावात नवीन चेहऱ्याला मतदारांची पसंती

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ :  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा राज्यातील निकाल पाहता नवीन चेहऱ्याला लोकांची पसंती दिसते. असाच कल विधानसभा निवडणुकीतही दिसू शकतो. शेवगाव पाथर्डीतही विधानसभेला नवीन चेहरा म्हणून जनता हर्षदा काकडे यांच्या उमेदवारीवर सकारात्मकता दाखवू शकते. त्यामुळे येत्या विधानसभेला काकडे यांनी उभे रहावे अशी सर्व सामान्यांची भावना असल्याचे प्रतिपादन जनशक्तीचे कार्यकारणी सदस्य व खरडगाव येथील सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब बोडखे यांनी शेवगाव येथे केले.

शुक्रवारी (दि.७) शेवगाव येथे जनशक्ती विकास आघाडीच्या कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रंगनाथ ढाकणे होते तर बैठकीस जनशक्तीचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे, पंडितराव नेमाने, अकबर भाई शेख, बाबासाहेब म्हस्के, गोरक्ष वावरे, सुरेश चौधरी, गणेश धावणे, आदिनाथ धावणे, बाबासाहेब ढाकणे, अनिल नागरगोजे, सुनील गायके, माणिक गर्जे, गणेश उगले, आबासाहेब काकडे, शिवाजी औटी, आदि प्रमुख उपस्थितीत होते.

 यावेळी बोडखे  म्हणाले,  त्याच त्याच उमेदवारांना लोक कंटाळले असून लोकांना नवीन चेहरा हवा आहे. तालुका विकासापासून वंचित ठेवण्याचे काम प्रस्तापित नेत्यांनी केले आहे. काकडे ताई या तळागाळातील गोरगरिबांचे प्रश्न तेही मोठे पद नसतांना सोडवत आहेत. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत नवीन चेहरा म्हणून शेवगाव पाथर्डीकर स्वीकारणार आहेत.

सुनील गायके म्हणाले, काकडे ताईंनी ताजनापूर लिफ्ट १७ गावांचा प्रश्न अनेक आंदोलने हाती घेऊन मार्गी लावला. तसेच वरुर-आखेगावसह ९ गावांच्या पाणी प्रश्नावर ते आता लढत आहेत. शेवगाव शहराच्या पाणी प्रश्नावर त्यांनी वाचा फोडली आहे. अशा लढवय्या नेत्याची शेवगाव पाथर्डी तालुक्याला गरज आहे. तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी ते पाठपुरावा करत आहेत. तालुक्याच्या विकासाचा आलेख उंचावण्याचा असेल तर आपल्याला काकडे यांना विधानसभेसाठी निवडून द्यावे लागणार आहे.  माणिक गर्जे यांनी प्रास्ताविक केले अशोक पातकळ यांनी आभार मानले.