पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे खडकीच्या महिलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : जो प्रश्न मागील अनेक दशकापासून प्रलंबित होता तो प्रश्न आ. आशुतोष काळेंनी सोडवून दाखविला आहे. कधी आठ तर कधी पंधरा दिवसांनी येणारे पाणी रविवार (दि.२२) पासून तीन दिवसांनी येवू लागले आहे. त्यामुळे साहजिकच कोपरगावच्या नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आपले प्रश्न जाणणारा व ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडविणाऱ्या नेतृत्वाला अधिक ताकद मिळावी या उद्देशातून कोपरगाव शहराच्या उपनगरातील खडकी भागातील कोल्हे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह महिलांनी देखील आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

कोपरगाव शहरातील गौतम बँकेच्या प्रांगणात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा देतांना ते म्हणाले की, ज्या विश्वासाने जनतेने माझ्यावर विश्वास दाखविला त्या विश्वासाला सार्थ ठरवून मतदार संघासह कोपरगाव शहराचा देखील विकास करून दाखविला आहे.

नागरिकांना विकास अपेक्षित असतो. त्यामुळे त्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करणे हि लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी पार पाडतांना पाणी प्रश्न सोडविण्याच्या दिलेल्या वचनांची पूर्तता करून तो प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची वाट धरली आहे याचा विशेष आनंद होत असून त्यामुळे विकास कामे करतांना अधिकची उर्जा प्राप्त होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी विशेषत: महिलांनी सांगितले की, आम्ही जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न आ. आशुतोष काळे यांनी सत्यात उतरवून दाखविले आहे. ज्याच्याशिवाय महिला भगिनींची कोणतीच कामे होवू शकत नाही तो पाणी प्रश्न सुटला आहे व कोपरगाव शहराचा देखील विकास झाल्यामुळे आमच्याकडे जे नातेवाईक यायचे बंद झाले होते ते आता पुन्हा येणार आहेत. त्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न किती महत्वाचा होता याचे महत्व आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही स्वखुशीने आ.आशुतोष काळे यांना पुन्हा आमदार करण्यासाठी राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते