मार्च अखेर पोहेगाव पतसंस्था २०० कोटींचा टप्पा पार करणार – नितिनराव औताडे 

संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कुठलीही संस्था एकाएकी भरभराटीला येत नाही. त्यासाठी संस्थेच्या संचालकापासून सभासदांपर्यंत अनेकांचा मोठा त्याग असतो. पोहेगाव नागरी पतसंस्थेने ३५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. ३४ वर्षात अनेक संस्था स्थापन झाल्या मात्र व्यवहारात अनियमितता आल्यामुळे त्यांना गाशा गुंडाळावा लागला. सुरुवातीचे १२-१३ वर्ष संस्था उभी करताना खूप परिश्रम घ्यावे लागले. मात्र त्यानंतर ठेवीदारांना आपले पैसे या संस्थेत सुरक्षित राहील याची खात्री झाली नंतर संस्थेची भरभराट सुरू झाली.

संस्थेने समाज हित जोपासत व्यावसायिक शेतकरी व व्यापारी छोट्या मोठ्या उद्योगांना हातभार लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पारदर्शक कारभार व तत्पर सेवेमुळे ठेवीदारांचा संस्थेप्रती विश्वास वाढला आहे. संस्थेचं ५०० कोटी ठेवी पुर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. नफा कमवणे हा संस्थेचा उद्देश नाही सर्वांसाठी चालवली जाणारी ही संस्था असून जास्तीत जास्त सेवा देण्याचे काम केले जाते. संस्था स्थापनेपासून आजतागायत सलग संस्थेला एडिट वर्ग अ मिळाला आहे. संस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच असून संस्था येणाऱ्या मार्च अखेरपर्यंत २०० कोटीचा ठेवींचा टप्पा ओलांडणार असल्याचा विश्वास पोहेगाव पतसंस्थेचे संस्थापक शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी बोलून दाखवला.

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे होते. यावेळी कोपरगाव बाजार समितीचे संचालक अशोक नवले, बापूसाहेब औताडे, स्त्री निधीचे संचालक रमेश झांबरे, उपाध्यक्ष विलास रत्ने, संस्थेचे संचालक त्रिलोककुमार मखिजा, अर्जुन पवार, रियाज शेख, डॉ. प्रा. शांतीलाल जावळे, आढाव, विनायक मुजगुले, रघुनाथ औताडे ,अरुण डोखे, वाघ, प्रशांत रोहमारे, प्रभाकर होन, अनिल होन, ॲड. शिवाजी खामकर, पत्रकार अरुण गव्हाणे, लक्ष्मण जावळे, संस्थेचे व्यवस्थापक सुभाष औताडे, सह. व्यवस्थापक विठ्ठल घारे, मोजड, कोल्हे अदीसह संस्थेचे कर्मचारी, कलेक्शन प्रतिनिधी, वसुली अधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अहवाल विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे सह व्यवस्थापक विठ्ठल घारे यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष विलास रत्ने यांनी केले. आढाव व डॉ. शांतीलाल जावळे यांनी सांगितले की संस्था चालवताना विविध अडचणीचा सामना संस्था चालकांना करावा लागतो. मात्र संस्थेचे नेतृत्व कोण करत यावर संस्थेची प्रगती अवलंबून असते. सर्वांना बरोबर घेऊन नितीनराव औताडे यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्यात असलेल्या नेतृत्वगुणामुळे संस्थेची भरभराट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.तर शिवाजी जावळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की संस्था चालवताना नितीनराव औताडे हे उत्तम प्रशासक म्हणून काम करत आहे. म्हणूनच  संस्था नावारूपाला आली असल्याचे सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे यांनी संस्थेला २ कोटी ६६ लाख ७१ हजार रुपये नफा झाला असून सभासदांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळीपूर्वी सभासदांना ९ टक्के लाभांश देणार असल्याचे जाहीर केले. सूत्रसंचालन संस्थेचे संचालक रियाज शेख यांनी केले तर आभार अर्जुन पवार यांनी मानले.