सत्य आणि अचूक बातमी लोकांपर्यंत पोहोचविणे पत्रकारांची जबाबदारी – डॉ. विजय चोरमारे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ :ज्या भागात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीतून नागरिकांच्या राहणीमानात अमुलाग्र बदल झाले व सहकाराच्या माध्यमातून कशा प्रकारे विकास साधला जावू शकतो हे कारखाना परिसराच्या प्रगतीवरून दिसून येते. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतीतही चुकीचे गैरसमज असल्याचे दिसून येते असे अनेक नरेटिव्ह सोशल मिडीयाच्या माध्यमातून बेमालूमपणे पसरविले जातात त्याची कोणी सत्यता पडताळूनही पाहत नाही. मात्र अशा फेक नरेटिव्हची खातरजमा करणे हे पत्रकारांचे कर्तव्य असून सत्य आणि अचूक बातमी नागरिकांपर्यंत पोहोचविणे हि पत्रकारांची जबाबदारी असल्याचे रोख ठोक मत जेष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक डॉ.विजय चोरमारे यांनी व्यक्त केले.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्या प्रसंगी डॉ.विजय चोरमारे बोलत होते.

दरम्यान आशुतोष काळे म्हणाले की, पत्रकार समाजाचा आवाज महणून कार्य करत असल्याने लोकशाहीमध्ये पत्रकारांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात पत्रकारितेचा सिंहाचा वाटा राहिला आहे. तेव्हा पासून आजतागायत पत्रकार बंधू-भगिनी समाजाच्या न्याय हक्कासाठी नागरीकांचा आवाज बनून अविरत लढा देत आहेत. दररोज नवीन आवाहने आणि नवीन प्रश्न, समस्या मांडण्याचे प्रामाणिक प्रयत्न पत्रकार करत असतात.

सामाजिक अन्याय, आणि राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण करून लाखो नागरिकांना जागरूक करण्याचे काम पत्रकार करीत आहेत.अन्यायाला वाचा फोडण्याची जबाबदारी खरं तर सोपी नाही मात्र बदलती पत्रकारिता स्वीकारून आपले काम अविरत आणि निर्धास्तपणे पत्रकार करीत आहेत याचा मनस्वी अभिमानअसल्याचे आ.आशुतोष काळे म्हणाले.

डॉ. चोरमारे पुढे म्हणाले कि, कारखाना व उद्योग समूहाच्या संदर्भात पत्रकार वर्षभर बातमीदारीच्या माध्यमातून प्रसिद्धी देतात या कृतज्ञता पोटी पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो हे कौतुकास्पद आहे. आजच्या काळात पत्रकारिता खूप जोखमेची झालेली आहे. आपला जीव धोक्यात टाकून पत्रकारिता करणे आवश्यक नाही परंतु खरी आणि प्रामाणिक पत्रकारिता करणे तेवढेच गरजेचे आहे. आजकाल पत्रकारितेचे स्वरूप आणि पत्रकारांची मानसिकता बदलत चालली आहे त्यामुळे आपण कुठून कुठे चाललो आहे याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

साखर कारखानदारीतील कामगारांच्या आकडेवारीचा विचार केल्यास सगळ्यात जास्त रोजगार साखर कारखानदारीमुळे निर्माण झाला असल्याचे सत्य समोर येते. ज्या भागात सहकारी साखर कारखाने नाहीत तो भाग बघता ज्या भागात सहकारी साखर कारखाने आहेत तो भाग सुजलाम सुफलाम झालेला दिसून येतो. सहकारी साखर कारखान्यातून परिसराचा कसा आणि किती विकास करता येतो हे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखन कारखान्याचा परिसर बघितल्यावर लक्षात आले. स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांचे जीवन कार्य स्मृती उद्यानाच्या माध्यमातून आ.आशुतोष काळे यांनी अत्यंत उत्कृष्टपणे मांडले असल्याचे डॉ.विजय चोरमारे यांनी यावेळी सांगितले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अवघ्या ४०९ मतांनी नगराध्यक्षपद हातातून निसटले. २०१६ झाली झालेल्या नगरपरीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पूर्ण पॅनल लढविला होता आणि विरोधकांनी मात्र दोन पक्ष मिळून एक पॅनल तयार केला होता तरी त्यावेळी राष्ट्रवादीला ०७ जागा मिळाल्या होत्या. २०२५ च्या निवडणुकीत विरोधकांनी लोकसेवा व अपक्ष यांच्या सोबत आघाडी करूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ नगरसेवक विजयी झाले. यावरून कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ज्या पद्धतीने विरोधकांनी निवडणुकीत प्रचार केला त्यावरून निवडणूक नगरपालिकेची होती कि, समता पतसंस्थेची हेच मतदारांना कळले नाही. तरीही मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रूपाने सक्षम विरोधी पक्ष नगरपालिकेत दिला असून  राष्ट्रवादीचे नगरसेवक आपली जबाबदारी चोख पार पडतील.- आ. आशुतोष काळे.