रांजणगाव देशमुखचा ५ मेगावॅट सौर प्रकल्प सुरू – आमदार विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : तालुक्यातील रांजणगाव देशमुख आणि अंजणापूर येथे उभारण्यात येत असलेल्या प्रत्येकी ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होण्याच्या प्रयत्नांना मोठी गती मिळाली आहे. रांजणगाव देशमुख येथील ५ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प १६ एकर क्षेत्रात उभारण्यात आला असून तो कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पाची वीज रांजणगाव देशमुख येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राला जोडण्यात आली असून वीजपुरवठा सुरू झाला आहे.

रांजणगाव देशमुख येथील ५मेगावॅट सौर प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.त्याच प्रमाणे अंजणापूर येथील ५ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्पही १७ एकर क्षेत्रात उभारण्यात आला असून त्याची उपकेंद्राशी जोडणी करण्याचे काम तातडीने व्हावे.ही जोडणी करून देत महावितरणला वीज देण्याचे नियोजन करावे त्यामुळे परिसरातील विजेची समस्या सुटण्यास हातभार लागेल अशी सूचना आ.विवेक कोल्हे यांनी केली आहे.

रांजणगाव देशमुख आणि अंजणापूर या दोन्ही प्रकल्पांची एकत्रित क्षमता १० मेगावॅट असून त्यासाठी सुमारे ३३ एकर क्षेत्र आहे. या दोन्ही प्रकल्पांचा वीजपुरवठा रांजणगाव देशमुख ३३/११ केव्ही उपकेंद्रामार्फत वितरण जाळ्याला जोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सौर प्रकल्पांद्वारे कृषी फिडरला दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाला या प्रकल्पांमुळे हातभार लागणार आहे. 

दरम्यान, अंजणापूर प्रकल्पाची जोडणी आणि कार्यान्वयनाची प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत लांबू नये, यासाठी आ. विवेक कोल्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना रात्रीच्या वीजपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागू नये आणि शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी दोन्ही प्रकल्पांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यावर त्यांनी भर दिला आहे.

रांजणगाव सबस्टेशनचे इन्चार्ज रोशन टर्ले यांना सूचना करत शेतीसाठी दिवसा वीज देण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अंजणापूर सौर प्रकल्पाच्या जोडणीनंतर परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे असेही कोल्हे म्हणाले.

Leave a Reply