कोपरगावमध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाहणी करा, आमदार काळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील २५ दिवसांपासून पाऊस झालेला नसल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण मतदार संघात दुष्काळजन्य परिस्थिती असून कोपरगाव मतदार संघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी तातडीने पाहणी सुरू करावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोपरगाव मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव मतदार संघामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाहणी करण्यात यावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.२१) रोजी जिल्हाधिकारी डॉ. सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेवून त्यांना पाऊस नसल्यामुळे मतदार संघात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माहिती देवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव मतदारसंघ पर्जन्य छायेखाली येत असल्यामुळे कोपरगाव मतदार संघात दरवर्षी पर्जन्यमान जेमतेमच असते. मात्र यावर्षी मतदारसंघात अत्यंत कमी पाऊस पडला असून मागील अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे खरिपाची सर्वच पिके जळून चालली आहेत. ऐन पावसाळ्यात विहिरींनी देखील तळ गाठला असून जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघात सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे मतदार संघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी लवकरात लवकर पाहणी करावी.

तसेच ब्रिटिश काळापासून कोपरगाव मतदार संघातील १६ गावे खरीप व ६३ गावे रब्बी ठरवण्यात आली आहेत. परंतु मतदार संघातील सर्वच गावात खरीप हंगामात बाजरी, मका, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमुग, कांदा आदी पिके घेतली जात असून, सर्वच गावांची नोंद खरीपाची व्हावी व मतदार संघातील सर्व गावांचा या पाहणीमध्ये समावेश करावा अशी प्रमुख मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघात प्रत्येक मंडलामध्ये एकच पर्जन्यमापक केंद्र आहे.

या हवामान केंद्रात झालेल्या पर्जन्यमानाच्या नोंदीनुसार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अवलंबून असून अचूक पर्जन्यमानाची नोंद होवून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी मतदार संघात पर्जन्यमापक यंत्रांची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे. विमा काढलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सरसकट विम्याचा लाभ द्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हा विमा प्रतिनिधी पंकज रोहोम यांच्याकडे केली आहे. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, अपर तहसीलदार विकास गंबरे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आदी उपस्थित होते.