संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथक धावले कोपरगावकरांच्या मदतीला

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : कोपरगाव शहर आणि परिसराला गुरुवारी मध्यरात्री पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कोपरगावच्या इतिहासात यापूर्वी झाला नव्हता इतका जोरदार पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हाहाकार उडालेला असताना सर्वात प्रथम संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथक, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक तसेच भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीला धावून गेले.

त्यांनी शहरातील विविध भागातील नागरिकांच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये शिरलेले पाणी उपसले तसेच नाश्ता व भोजनाची व्यवस्था करून आपदग्रस्त नागरिकांना धीर दिला. संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या सूचनेनुसार संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोपरगाव शहरातील विविध भागात तात्काळ धाव घेत घरांमध्ये, दुकानांमध्ये शिरलेले पाणी उपसून बाहेर काढले. आपदग्रस्त नागरिकांना नाश्ता आणि भोजन पुरवून त्यांना दिलासा दिला.

१९ ऑक्टोबर मध्यरात्री सर्व नागरिक गाढ झोपेत असतानाच अचानक कानठळ्या बसविणाऱ्या विजांचा कडकडाट अन ढगांचा गडगडाट करीत एकच्या सुमारास कोपरगाव शहरासह तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री एक ते पहाटे साडेचार-पाच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत होता. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, अनेक नागरी वस्त्यांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे प्रचंड नुकसान पाहून या अस्मानी संकटाची भयावहता आज सकाळी समोर आली.

तालुक्यातील अनेक गावानाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसाने हातातोंडाशी आलेली पिके पूर्णत: वाया गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीचा सण तोंडावर आला असताना कोसळलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. सलग चार तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची माहिती मिळताच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांनी पावसाची झळ बसलेल्या कोपरगाव शहरातील विविध भागांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आणि तातडीने संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत पोहोचवली.

खडकी, गोकुळनगरी, कर्मवीरनगर, समतानगर, शारदानगर, संजयनगर, खंदक नाला आदी भागात अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले. पावसामुळे काही भागातील रस्तेही वाहून गेले. खडकी, गोकुळनगरी, कर्मवीरनगर, शिक्षक कॉलनी. द्वारकानगरी, संजयनगर, ब्रिजलालनगर आदी भागात अनेक नागरिकांच्या घरांमध्ये गुडघ्याइतके पाणी साचल्याने घरातील अन्नधान्य, कपडे व इतर जीवनावश्यक साहित्य भिजून मोठे नुकसान झाले. सदैव कोपरगावकरांच्या मदतीला धावून जाणारे कोल्हे कुटुंबीय आणि संजीवनी उद्योग समूहाची यंत्रणा यावेळीही नागरिकांच्या मदतीला धावून आली.

अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, माजी उपनगराध्यक्ष व नगरपालिकेतील भाजपचे माजी गटनेते रवींद्र पाठक, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माधवराव आढाव पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, प्रसाद आढाव, माजी नगरसेवक जनार्दन कदम, फकीर महंमद पैलवान, खालिकभाई कुरेशी आदींनी आज सकाळी कोपरगाव शहरातील खडकी, गोकुळनगरी, कर्मवीरनगर, संजयनगर, निवारा, खंदक नाला आदी भागात जाऊन पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नागरिकांना मदत करून धीर दिला.