नववधू, मावशी व मध्यस्थी दलालने घातला २ लाख ६० हजाराला गंडा

शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : मुला मुलीच्या संख्येतील विषम प्रमाणामुळे अनेक मुलांच्या लग्नाचा प्रश्न बिकट बनलाय. नेमक्या या अडचणीचा फायदा काही जण उठवत असल्याच्या अलीकडे अनेक घटना घडत आहेत. काहींचा तर लग्नाची मुले शोधून त्या कुटुंबास गंडा घालवण्याचा व्यवसाय बनला आहे.

तालुक्यातील कोळगाव येथील एका वर बापाला त्याच्या मुलासाठी सोयरीक दाखवून मुलीला आई-वडील नसल्याने तिचा सांभाळ करणाऱ्या तथाकथित तिच्या मावशीला व मध्यस्थाला चक्क दोन लाख मोजावे लागले. नवरीने त्यावर आणखी कडी केली. मुलाच्या घरी आल्यावर घरातील रोख तीस हजार रुपये व ३० हजाराचे १२ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण साठ हजाराला गंडा घालून नवरीने घरातून भल्या पहाटे पोबारा केल्याची घटना घडली. या संदर्भात मुलाचे वडीलांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दोन लाख साठ हजार रुपये फसवणुकीची तक्रार दिली आहे.

      या संदर्भात मुलाचे वडील पंडित रामभाऊ कोरडे (वय ५५ रा . कोळगाव ता. शेवगाव ) यांनी दिनांक २९ जानेवारीला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमच्या परिचित असलेल्या पिचडगाव तालुका नेवासा येथील संभाजी नानासाहेब ब्राह्मणे याने मुलगा नितीन याचे साठी नगर तालुक्यातील जेऊर येथील दीक्षा महादेव कदम या मुलीचे स्थळ सुचविल्याने दि. २०  जानेवारीला दुपारी मुलगा नितीन सह गौतम दिलीपराव खंडागळे, यशवंत लक्ष्मण बोरडे, अशोक दळवी असे बायजाबाई जेऊरला गेलो.

तेथे संभाजी ब्राह्मणे याने आम्हाला जेऊर गावातून ससेवाडी रोडने एका वस्तीवर पत्र्याच्या घरासमोर नेले. तेथे नवरी दीक्षा  हीची गुरु आजी रहात असल्याची माहिती दिली. तिथे मुलगी दीक्षा व तिची बहीण, तिची मावशी मीराबाई जाधव होत्या. आम्ही मुलगी पाहिली असता मुला मुलीची पसंती झाली. त्यावर मुलीची मावशी मीराबाई जाधव हिने मुलीला आई-वडील नाही, मी तिला लहानाचे मोठे केले आहे. आम्ही काही मोठे लग्न लावणार नाही. तुम्ही तिची माळ घालून लागलीच लग्न करून घेऊन जा. असे सांगितल्याने आम्ही सर्वांनी विचार करून सायंकाळी साडेपाचचे सुमाराला लग्नाचा कार्यक्रम आटोपून मुलगी दीक्षा तिची मावशी मीराबाई तिची बहीण यांचे सह कोळगावला आलो.

      दुसऱ्या दिवशी सकाळी संभाजी ब्राह्मणे याने, मीराबाईने दीक्षाला लहाणाचे मोठे केले. त्या बदल्यात संगोपण खर्च म्हणून तुम्ही तिला दोन लाख रुपये द्या असे सांगितले. यावर आम्ही मुलाच्या भविष्याचा विचार करून मीराबाई हीस दोन लाख रुपये देण्यास कबूल झालो. दुसऱ्या दिवशी दिनांक २१ ला चापडगाव येथून चुलती शोभा यशवंत गोरडे यांच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून पन्नास हजार रुपये व घरातील पन्नास हजार रुपये असे एक लाख रुपये मीराबाई जाधव हिला गौतम दिलीपराव खंडागळे, यशवंत लक्ष्मण बोरडे, अशोक दळवी यांचे समक्ष दिले. त्यानंतर दिनांक २६ जानेवारीला मिराबाई जाधव व संभाजी ब्राह्मणे शेवगावच्या स्टँडवर आले असता मिराबाई कडे ५० व ब्राहमणे कडे ५० असे आणखी एक लाख रुपये दिले.  

    त्यानंतर दिनांक २७ जानेवारीला पहाटे ४ चे सुमारास मुलगी दिक्षा गायब झाली. शोधाशोध करतांना घरात ठेवलेले ३० हजार रूपये रोख व ३० हजाराचे १२ ग्रॅम सोन्याचे दागिने ती घेऊन गेल्याचे लक्षात आले, कोळगावातील यशवंत लक्ष्मण गोरडे यांनी नवरी मुलगी एमएच २० सीए३९२९ या क्रमांकाच्या पल्सर मोटरसायकलवर एका अनोळखी पुरुष व एका महिलेसोबत जातांना पाहिल्याचे सांगितल्यावर आम्ही मध्यस्थी संभाजी ब्राहमणे याचे कडे जाऊन चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची भाषा केली.

तसेच जेऊर येथे मिराबाई, दिक्षा व तीच्या बहिणीकडे गेलो असता तेथील पत्र्याच्या खोलीला कुलूप आढळल्याने संभाजी ब्राह्मणे ( रा.पिचडगाव तालुका नेवासा ) मीराबाई जाधव (रा.  बायजाबाई जेऊर ता. नगर ) दीक्षा महादेव कदम व तिची बहीण ( नाव गाव माहित नाही ) यांनी खोटा बनाव करून आम्हास २ लाख ६० हजाराला गंडा घातल्याचे लक्षात आल्याने त्यांचे विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.