कंपन्यांना समस्या सोडविणारे स्मार्ट इंजिनिअर्स पाहिजेत – अर्श गोयल

   कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण आपले चांगले करिअर घडविण्यासाठी धडपडत असतो. पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण, त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश आणि शेवटी चांगल्या पॅकेजची नोकरी मिळावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. परंतु यासाठी अभियांत्रिकी शिक्षणातील अंतिम टप्पा म्हणजे शेवटची किमान दोन-तीन वर्षे खुप महत्वाची असतात, त्यात चांगले कष्ट घेवुन स्वतःला विकसित केले तर चांगले करिअर घडतेच, असे प्रतिपादन सॅमसंग कंपनीचे सिनिअर साॅफ्टवेअर इंजिनिअर अर्श गोयल यांनी केले.

  संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागनिहाय तज्ञ व्यक्तिंना बोलवुन उद्योग जगताची अपेक्षा आणि विध्यार्थ्यांनी कोणती कौशल्ये विकसित करावी, या विषयी मार्गदर्शन करण्यात येते. यावेळी काॅम्प्युटर इंजिनिअरींग विभागाने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात काॅम्प्युटर, आयटी व इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअरींगच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन  करताना गोयल बोलत होते. या प्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी, डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, काॅम्प्युटर इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डाॅ. डी. बी. क्षिरसागर आदी उपस्थित होते.

   गोयल पुढे म्हणाले की, प्रत्येक देशात स्पर्धा आहे. या स्पर्धेतील आपणही एक घटक आहोत. म्हणुन करिअरच्या बाबतीत लवकर विचार करा, त्यावर काम करणे सुरू करा, यशही लवकर मिळेल. याबाबी अधिक सुलभ व्हाव्यात यासाठी आयआयटी सारखी संस्कृती निर्माण करावी. सारख्या विचाराच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येवुन आपल्या करिअरशी निगडीत बाबींवर मंथन करावे, आवश्यक असलेल्या बाबींची आवड निर्माण करा. संगणक क्षेत्राताल चांगल्या पॅकेजच्या नोकरीसाठी एक आवड असलेली चांगली प्रोग्रामिंग भाषा निवडावी, डेटा स्ट्रक्चर विषयाचा चांगला अभ्यास करावा, संगणक विषयी मुलभुत गोष्टी माहिती करून घ्याव्यात व विविध प्रकल्पांवर काम करावे.

या चारसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी केल्यास गुगल, मायक्रोसाॅफ्ट, अमेझाॅन, आयबीएम, इत्यादी चांगल्या कंपन्यांमध्ये  रू ४० लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळु शकते. कंपन्यांना समस्या सोडविणारे स्मार्ट इंजिनिअर्स आवश्यक असतात. त्यासाठी योग्य डोमेन (ज्ञानाचे किंवा कार्याचे क्षेत्र) निवडणेही तितकेच महत्वाचे असते, असे सांगून विध्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली.

 यावेळी गोयल यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात कोणत्या कंपन्यांचे प्रतिनिधी परीसर मुलाखतीसाठी येतात व कोणत्या कंपन्यांना कोणती कौशल्ये अपेक्षित आहे, या विचारलेल्या प्रश्नावर विध्यार्थ्यांनी अचुक उत्तरे दिली. गोयल यांच्या मार्गदर्शनातून  आम्हाला चांगले ज्ञान तर मिळालेच, परंतु चांगल्या पॅकेजच्या नोकरीसाठी एक दिशा दर्शक मार्गही मिळाला, अशा  प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. प्रा. अतुल मोकळ यांनी आभार मानले, तर डाॅ. एस. आर. देशमुख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परीश्रम घेतले.