बिनधोक प्रवासाची शाश्वती द्या अन्यथा आंदोलन

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या शेवगाव शहरातून होणारे दळणवळण उच्चांकी आहे. त्यातच पंचक्रोशीत असलेल्या साखर कारखान्याचा हंगाम जोरात सुरू असल्याने येथे वरचेवर वाहतूक कोंडी होत असते.  अरुंद रस्ते आणि रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या समस्येतून  शेवगावकरांची सुटका करावी अन्यथा नाईलाजाने उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिंदे गटाच्या शिवसेनेने तालुका प्रशासनाला दिला आहे.

       या संदर्भात तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव शहरातून प्रवासी वाहतुकीसह अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यावर अतिक्रमणामुळे आणि त्याही पुढे उभ्या केलेल्या वाहनामुळे रस्ता शिल्लकच रहात नाही. त्यातूनच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या जुगाडाची वर्दळ सुरू असते. शेवगावला बायपास नसल्याने होणारी सर्व वाहतूक ही शहरातून होते, येथे अनेकदा अपघात झाले असून बस स्थानकाजवळील क्रांती चौकात एकदा वाहतूक कोंडी झाली की ती किमान दीड दोन तास सुरळीत होत नाही.

यातून प्रशासनाने मार्ग काढावा वाहतूक कोंडी न होता प्रवाशांना बिनधोक प्रवास करता येईल अशी शाश्वती द्यावी. अन्यथा यासंदर्भात नाईलाजाने तीव्र आंदोलन छेड़ावे लागेल. असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी शिंदे गट शिवसेनेचे युवा सेना जिल्हा प्रमुख साईनाथ आघाट, तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे, प्रभाकर गायकवाड, विशाल परदेशी, अशुतोष पुरनाळे उपस्थित होते.