कोपरगाव ते येवला दरम्यान सर्व एसटी बसला थांबा द्यावा – विधिज्ञ पोळ

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : कोपरगाव ते येवला दरम्यान असलेल्या गावांना बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून या मार्गावरील थांब्यावर सर्व एसटी बसला थांबा द्यावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष विधिज्ञ नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, कोपरगाव ते येवला दरम्यान असलेल्या टाकळी फाटा, भास्कर वस्ती, येसगाव,आंचलगाव चौकी,पिंपळगाव चौकी व म्हसोबा चौकी या ठिकाणी काही वर्षांपूर्वी बऱ्याच बस थांबत होत्या मात्र आता या मार्गावर दिवसातून शेकडो बस जातात मात्र या ठिकाणी बसला अधिकृत थांबा नसल्यामुळे सद्या कोणत्याच बस थांबत नाही- 

नाटेगाव, पिंपळगाव, येसगाव येथील अनेक मुले-मुली महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोपरगाव व येवला तसेच एस एन डी टी महाविद्यालयात जातात मात्र एस बसला थांबा नसल्याने या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मासिक पास सवलत असताना देखील कोणताही लाभ मिळत नाही उलट खाजगी मिळेल त्या वाहनातून प्रवास करावा लागतो तर विद्यार्थिनींना ट्रक, टेम्पो या मिळेल त्या वाहनाला हात देऊन महाविद्यालयाच्या ठिकाणी जावे लागत आहे.

पूर्वी कोपरगाव ते येवला दरम्यान जनता बस सुरू होती. तसेच कोपरगाव आगाराची कोपरगाव – नाटेगाव बस होती मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सदर बस बंद आहे एका बाजूला शासन एस टी बस मध्ये महिलांना प्रवासात पन्नास टक्के सूट देत आहे तर दुसऱ्या बाजूला या मार्गावर बस नसल्याने मुली व महिलांचे अतोनात हाल होत आहे.

माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे साहेब परिवहन मंत्री असताना या स्थानकावर सर्व बसला थांबा देण्यात आला होता, मात्र आता कोणतेच लोक प्रतिनिधी या विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे येवला कोपरगाव मार्गावर दोन्ही बस आगारानी  जनता बस सुरू करावी अथवा लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांना थांबा द्यावा अन्यथा या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन रास्तारोको करण्यात येईल असा इशारा या पत्रकाद्वारे दिला आहे.