कोल्हे साखर कारखान्याची फार्मा क्षेत्रात भारतात ओळख निर्माण होईल – शेखर गायकवाड 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : सहकाररत्न माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशातील साखर उद्योगाला स्पर्धेत टिकण्यासाठी सातत्यांने तंत्रज्ञान विकास बदलाचा विचार दिला त्याच तालमीत त्यांचे नातू विवेक कोल्हे तयार झाले असून त्यांनी कारखानदारीच्या माध्यमांतून फार्मा निर्मातीवर लक्ष केंद्रीत करून पॅरासिटामॉल औषध उत्पादनावर भर दिला असून त्यांच्याबरोबरच संचालक मंडळाच्या दुरदर्शी वाटचालीमुळे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची फार्मा क्षेत्रात आगामी काळात भारतात नवि ओळख निर्माण होईल असे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.

साखर उद्योगात महाराष्ट्र राज्य जगात तिस-या स्थानावर आहे, सहकारासमोर खाजगीचे आव्हान आहे पण साखर कारखानदारी व त्यात कार्य करणा-या युवा नेतृत्वाने यातील बदलांचा वेळीच अभ्यास करून तशी ध्येयधोरण घेवुन आपण आपली स्वतःची ओळख वेगवेगळी उत्पादने घेवुन निर्माण केली तरच साखर उद्योग टिकेल असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

           साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना ‘सर ही मानद उपाधी मिळाल्याबददल त्यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गुरूवारी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी विशेष सन्मानपत्र देवुन सपत्नीक सत्कार केला. यानिमीत्ताने अहमदनगर, नाशिक व संभाजीनगर जिल्हयातील कार्यकारी संचालकांचा मेळावा आयोजित करण्यांत आला होता त्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे होत्या. राज्य विक्रीकर विभागाचे ट्रायब्यूनल जज्ज सुमेरकुमार काले, सहसंचालक शरद जरे यांचाही यावेळी सत्कार करण्यांत आला. 

            महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांचा योगायोगाने वाढदिवस असल्याने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला व संजीवनी कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपणही केले. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या प्रगतीचा आढावा देवुन साखर आयुक्त म्हणून शेखर गायकवाड यांनी केलेल्या वेगवेगळया धाडसी निर्णयांची माहिती दिली.

    कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी खाजगी कारखानदारीशी संघर्ष करत सहकाराला पाठबळ दिले. आधुनिक तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर करून उपपदार्थ निर्मातीबरोबरच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची देशात वेगळी ओळख निर्माण केली. पदमश्री डॉ. विठठलराव विखे पाटील,. डॉ.बाबूरावदादा तनपुरे, भाउसाहेब थोरात, बाळासाहेब विखे, मारुतराव घुले, शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप, शंकरराव काळे, आप्पासाहेब राजळे, यशवंतराव गडाख आदि नेतृत्वाने ग्रामिण अर्थकारणाला सहकाराच्या माध्यमांतून उर्जा देण्यांचे अहमदनगर जिल्हयात मोठे काम केले त्या सर्वांचा आदर्श युवा पिढीने घ्यावा.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अल्पभूधारक शेतक-यांच्या समस्या ओळखून त्यांना या पदाच्या माध्यमांतुन न्याय देण्यांचे चांगले काम केल्याने त्यांची कारकिर्द संस्मरणीय ठरली आहे. साखर कारखानदारीत आधुनिकीकरणाच्या साथीने असंख्य वेगवान निर्णय घेवुन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे उत्तम कुशल प्रशासक अशी ओळख अहमदनगर जिल्हयाच्या या सुपुत्रांने निर्माण केल्याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. 

           अध्यक्षपदावरून बोलतांना सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना माणसांच्या मनाची जोड मिळाल्याने त्यांचे प्रशासकीय कामकाज सर्वांनाच प्रेरणादायी ठरणार असून त्यांची २३ पुस्तके वैशिष्टय व अभ्यासपुर्ण आहेत. 

      गायकवाड पुढे म्हणाले की, प्रशासकीय सेवेत काम करतांना अनेक अनुभव आले. मुख्यमंत्री कार्यालयातही कामाची संधी मिळाली. सांगली जिल्हयातील अग्रणी नदीचे पुर्नजीवन करता आले, राज्याचा साखर आयुक्त म्हणून काम करतांना नवनवीन सुधारणा आत्मसात करून १०० वेगवान निर्णय घेवुन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली, राज्यातील सुमारे अडीच कोटी शेतक-यांचे आशिर्वादाचे पाठबळ असल्यामुळेच अडचणींवर मात करत पुढे जाता आले. गेल्या तीन वर्षात इथेनॉल, आसवनी, सहवीज निर्मीतीसह अन्य क्षेत्रात ३० हजार कोटींची गुंतवणुक झाली, बंद पडलेले २४ साखर कारखाने सुरू करता आले, त्यातुन हजारोंना रोजी रोटी मिळाली, आधुनिकीकरणामुळे दैनदिन गाळप क्षमतेत वाढ झाली, तेंव्हा साखर कारखानदारीत नव-नविन युवा नेतृत्वाने येवुन काळाच्या पुढे जाउन निर्णय घेण्याची गरज आहे.

साखर उद्योगातील बदलांच्या अभ्यासासाठी कार्यकारी संचालकांनी अभ्यासगट तयार करून सन २०५० मधील साखर कारखानदारी कशी असेल यासाठी आतापासूनच काम सुरू करावे. जागतिक स्तरावर भारत, ब्राझील, थायलंड, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड आघाडीवर असून महाराष्ट्र राज्य यात तिस-या स्थानावर आहे. मनुष्याने मिळालेल्या पदाच्या माध्यमांतून कामावर श्रध्दा ठेवुन इतरांसाठी काय करता येईल याचाच ध्यास सतत ठेवावा.

एकविसाव्या शतकात साखर कारखान्यांना मागणीनुसार उत्पादने तयार करावी लागतील, ज्या कारखान्यांना बंदर जवळ असेल त्यांनी साखर तयार करून निर्यातीवर लक्ष केंद्रीत करावे, रेल्वे वाहतुक जवळ असेल त्यांनी इथेनॉलवर भर द्यावा, साखर उद्योगांने स्वतःच स्वतःची ओळख निर्माण करून येणा-या अडी अडचणींवर उपाययोजना शोधाव्या, साखर उद्योग आता एनर्जी कॉम्प्लेक्स बनत आहे अशा परिस्थितीत हा उद्योग पहिल्या कमांकावर जाईल असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

            याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, मनेष गाडे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, सौ. उषा संजय औताडे, सौ. सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, आदिंच्या हस्ते अहमदनगर, नाशिक व संभाजीनगर जिल्हयातील सर्व कार्यकारी संचालकांचा सत्कार करण्यांत आला. आभार उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, मनुष्यबळ विकास अधिकारी प्रदिप गुरव, सचिव विधीज्ञ तुळशीराम कानवडे व त्यांच्या सर्व सहका-यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले. कामगार नेते मनोहर शिंदे, माजी सभापती सुनील देवकर, अशोक साखर कारखान्याचे संचालक श्री. शिंदे, सभासद शेतकरी, सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, विभागप्रमुख, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी माजी संचालक याप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित होते.