लग्नाची वरात मरणाच्या दारात…

व-हाड घेवून जाणारी पिक अप पडली विहीत, सातजन जखमी

कोपरगाव प्रतिनिधी दि. ४: लग्नाचं व-हाड घेवून जाणारी पिक अप गाडी कोपरगाव तालुक्यातील  तळेगांव मळे येथील शिवारातील एका विहीरीत कोसळल्याने गाडीतील एका लहान मुलांसह  सातजन गंभीर जखमी झाले तर तिघे गंभीर जखमी असुन त्यांना कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

 या घटनेची अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील सोनार वस्ती येथील  अशोक पवार यांचा मुलगा आकाश अशोक पवार यांचे छञपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे गुरूवारी दुपारी साडेबारा  वाजता लग्न असल्याने लग्नासाठी चुलत भावासह जवळच्या नातेवाईकांची  व- हाडाची पिक अप गाडी सोनार वस्ती  तेथुन सकाळी खुलताबाद च्या दिशेने निघाली असता.

मुंबई नागपूर महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील तळेगांव मळे शिवारात असताना  व-हाड घेवून जाणारी एम. एच. १५  जे. सी. १०२३ या  क्रमांकाची पिक अप  गाडीवरील चालक सचिन चव्हाण याने समोरुन येणाऱ्या गाडीला चुकवण्याच्या नादात आपल्या ताब्यातील गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून  रस्त्या शेजारी असलेल्या विहीत जावून कोसळली. 

 सकाळी साडेनऊच्या दरम्यान अचानक मोठा आवाज आल्याने आजुबाजूच्या नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली.  व- हाडाची पिक अप विहीत गेल्याने गाडीतील आठ जनांचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात आले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे तातडीने बचावकार्य सुरू झाले आणि काही क्षणात गाडीसह गाडीत अडकलेले माणसांना क्रेनच्या सहाय्याने  बाहेर काढल्याने कोणीही विहिरीतील पाण्यात बुडाले नाही.

तसेच विहिरीचा गोलाकार लहान असल्याने गाडी विहीरीच्या तळापर्यंत गेली नाही. दरम्यान घडलेल्या दुर्घटनेत पिक अप मधील कृष्णा पवार, आकाश जगन पवार,अनिल पवार हे गंभीर जखमी झाले. जखमींच्या डोक्याला खांद्याला, तोंडाला गंभीर जखमा झाल्या होत्या.

गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतून  कोपरगाव शहरातील फडके हाॅस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले तर कमी जखमी असलेल्या मधील गाडीचा  चालक सचिन चव्हाण, रवि पवार, एका चार वर्षांच्या मुलांसह इतर दोघांना वैजापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींपैकी सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती नवनाथ मोहिते यांनी दिली.  

लग्नाचे व-हाड चक्कं मरणाच्या दारात अशी स्थिती कोपरगाव तालुक्यातील सोनार वस्तीच्या पवार कुटूंबाची झाल्याने चिंता वाढली होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.