ऊस उत्पादन वाढीचा धडक कोल्हे पॅटर्न

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १९ :  ऊस हे शाश्वत पीक आहे, याचे सरासरी उत्पन्न घटू लागल्याने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखात्याने उस उत्पादन वाढीचा धडक कृती कार्यक्रम हाती घेतला असून सभासद शेतकऱ्यांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ व उसतज्ञ सुरेश माने यांच्या प्रमुख उपस्थीतीत कारखाना कार्यस्थळावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले होते त्याप्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते.

            प्रारंभी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी या योजनेची व्याप्ती समजावून सांगितली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे, बापुसाहेब बारहाते, ज्ञानदेव औताडे, निवृत्ती बनकर, यांनी कार्यक्षेत्रातील सभासद् शेतकऱ्यांचे प्रती एकरी शाश्वत उस उत्पादन वाढीसाठी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कोण-कोणते उपक्रम हाती घेतले याची माहिती दिली. 

             साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, उस व्यवस्थापक जी. बी. शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर यांनी आजवर कार्यक्षेत्रातील सर्वाधीक उस उत्पादन घेणाऱ्या सभासद शेतकऱ्यांबद्दल माहिती सांगितली. उसतज्ञ सुरेश माने यांचा यावेळी सत्कार करण्यांत आला.

        आनंदराव पाटील (१४२ टन) तांदुळवाडी- वाळवा, संजय कदम (११७ टन) खेराडवांगे जत, परमेश्वर दगडू राऊत (१३०टन) पेनूर मोहोळ, हरीदास भिंगारे (१४२ टन) नांदुरे, सुरेश गव्हाने (१०५ टन) कारंजवाडी- वाळवा, राजेंद्र बोंबले (१०३टन) कागल- कोल्हापुर, अमोल लाखे (१०० टन) दुधारी सांगली, पांडुरंग आव्हाड (१००टन) शिरपुरे धाराशिव या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने उसाचे एकरी शाश्वत शंभर में टनाच्या पुढे उत्पादन घेतले याची सुरेश माने यांनी माहिती देत उस उत्पादन वाढीसाठी नेमकेपणाने काय केले पाहिजे याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन त्यांनी केले.

              जमीनीचा पोत दिवसेंदिवस खराब होत आहे. संजीवनी सेंद्रीय खत, गंधक त्याचप्रमाणे वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटने उच्च प्रतीची तयार केलेली जीवाणू खते औषधे यांचा शेतकऱ्यांनी वापर वाढवावा, मशागत तण, पाणी, बेणे व्यवस्थापन, ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर आदी बाबी शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक हाताळून प्रती एकरी उस उत्पादन वाढवावे असे शेवटी ऊस तज्ञ सुरेश माने म्हणाले. शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले. यावेळी खत मात्रेसह ऊस उत्पादन वाढीचे शास्त्रोक्त बारकावे सभासद शेतकऱ्यांनी स्वतः टिपणं काढत लिहून घेतले.

 माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी कार्यक्षेत्रात दहा गुंठ्यात प्रती एकरी २५ मे. टन उसाचे उत्पन्न वाढ मोहिम राबवून ती यशस्वी करून दाखविली त्याचा प्रत्येकाने अवलंब करावा, ऊस वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि उपग्रहाची मदत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना घेत असल्याचे बिपीनदादा कोल्हे यावेळी बोलताना म्हणाले.