संतती हीच खरी संपत्ती – निलिमा पवार

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : ‘मुलं मोठ्यांचे अनुकरण करतात, तेव्हा पालकांनी स्वतः सभ्य कुटूंबाची आचार संहिता पाळावी, मुलांसमोर व्यसने करू नये, ते मागतील त्या वस्तु गरज असेल तरच द्या, नाही म्हणायला शिका, मुलांना पैशाचे मोल कळू द्या, त्यांना बाजार करायला शिकवा म्हणजे त्यांना व्यवहार कळेल. हे सर्व काही केले तर ते उद्याचे चांगले नागरिक बनतिल, पालकांचे स्वप्ने पुर्ण होतील, कारण आपली संतती हीच खरी संपत्ती आहे’. असा सल्ला नाशिक येथिल मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या माजी सरचिटणिस व माई या संस्थेच्या संस्थापिका निलिमा वसंत पवार यांनी पालकांना दिला.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स (एसजीआय) संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारीतोषिक वितरण सोहळ्यात पवार प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलत होत्या. यावेळी दुसऱ्या पाहुण्या नटरंग, हिरकणी अशा चित्रपटातुन रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, एसजीआयचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, कलावती कोल्हे, संचालिका डाॅ. मनाली कोल्हे, प्रिन्सिपल डायरेक्टर अशोक  कुमार जैन, प्राचार्या सुंदरी सुब्रमण्यम, हेड मिस्ट्रेस माला मोरे व पालक मोठ्या संख्येने हजर होते.

पवार पुढे म्हणाल्या की, शिर्डीच्या या पावन भुमित संजीवनीची शाळा सुरू व्हावी, हा श्री साईबाबांचा आशीर्वाद आहे. या स्कूल मध्ये शैक्षणिक  बाबींबरोबरच स्पर्धेत टिकण्यासाठी जे शिकायला पाहीजे, ते सर्व शिकविले जात असुन देश पातळीवरील बक्षिसे खेचुन आणल्याने विद्यार्थ्यांची  गुणवत्ता व शिक्षकांचे कष्ट अधोरेखित झाले आहे. आपल्या पाल्यांची तुलना दुसऱ्या मुलांबरोबर न करता त्यांची तुलना स्वतःशीच करायला शिकवा, असे पवार शेवटी म्हणाल्या.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, येथिल शिस्तबध्द सादरीकरण हे व्यावसायिक रंगभुमिच्या तोडीचे आहे. बाल कलाकारांचाच वाद्यवृंद, संवाद फेक, इत्यादी बाबी वाखनण्या लायक असुन अशा सहभागातुनच कलाकार जन्माला येतो. त्या म्हणाल्या की, मी अनेक ठिकाणी शाळा  व काॅलेजेस मध्ये स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने जाते. अनेक ठिकाणी सिनेमाच्या गाण्यावर कलाकार नृत्य करतात. परंतु येथे इतिहासातील स्वातंत्र्य सैनिक, राजे, महाराणी, संत, महणिय व्यक्ती, आदींच्या जीवनावर आधारीत सादर केलेल्या नाटीका आणि नृत्य केवळ वरवर नव्हे तर खोलवर रूजविण्याचा प्रयत्न झाला, हे पाहुन आनंद झाला.

अनेकदा पुढच्या पिढीचे कसे होईल, अशी चिंता असते. परंतु अशा प्रकारची शाळा पाहील्यावर ती चिंता निघुन जाते. संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांनी वर्षभरात राज्य व देश पातळीवरील विविध उपलब्धींची माहिती देत एसजीएसचे संस्थापक स्व.शंकरराव कोल्हे यांच्या संकल्पनेनुसार, अध्यक्ष नितिन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूल विविध यशाचे टप्पे गाठत असुन यात पालकांचा मोठे सहकार्य मिळत असल्याचे नमुद केले. तसेच शिक्षकांचेही त्यांनी कौतुक केले.

व्यावसायिक रंगभूमीला साजेसा रंगमंच, उत्क्रुष्ट  ध्वनी व्यवस्था व लाईट इफेक्टस्, विद्यार्थ्यांनीच सादर केलेल्या संगीतमय रचना, रसिक प्रेक्षकांकडून प्रत्येक सादरीकरणानंतरची दाद, इत्यादी बाबींमुळे सांस्कृतिक कार्यक्रम संस्मरणीय ठरला, असे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले. यावेळी शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले.