रविवारी पाच नंबर साठवण तलावाचे कॉंक्रीटीकरणाचा शुभारंभ

विरोधकांना देखील कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : शहराच्या जिव्हाळ्याच्या पिण्याच्या पाणी प्रश्नी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या पालिकेचा पाच नंबर तलाव पूर्ण करण्याच्या शब्दाची वचनपूर्ती केली आहे. १३१.२४ कोटी खर्चाच्या व राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या या साठवण तलावाच्या कॉंक्रीटीकारणाचा शुभारंभ रविवारी दुपारी चार वाजता होत आहे. या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांसह विरोधकांनी देखील कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाकार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले व माजी गटनेते विरेन बोरावके यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

गौतम बँक सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत वर्पे पुढे म्हणाले, शहराच्या पाणी प्रश्नी अनेकांनी आश्वासने दिली मात्र तोडगा काढण्याचे काम आमदार काळे यांनीच केले. पाच नंबर तलावासमवेत पालिकेच्या उर्वरित चार हि साठवण तलावांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. शहरात ९५ किमी लांबीच्या अंतर्गत वाहिन्या, मुख्य जलकुंभासह चार जलकुंभ उभारले जात आहे.त्यामुळे पालीकेची साठवण क्षमता दुपट्टीने वाढणार आहे. नव्या तलावात जिओ माम्रेनशीट अंथरण्यात येणार असून कॉंक्रीटीकरणामुळे राज्यात हा तलाव लक्षवेधी ठरणार आहे. आमदार काळेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या योजनेवर टीका-टिप्पणी करणे हे विरोधकांचे काम आहे मात्र त्यांनी देखील शहराचा मुख्य प्रश्न असल्याने योजनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे.

गटनेते विरेन बोरावके यावेळी म्हणाले, शहराची वाढती लोकसंख्या,पालिकेची साठवण क्षमता, पाण्याची मागणी लक्षात घेता आमदार काळे यांनी वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने केली. व्यापारी,नागरिकांनी आंदोलनाला पाठींबा दिला. अनेक त्रास सहन करून आमदार काळे यांनी मंजूर करून आणलेली सदरची योजना पूर्णत्वास नेत आहेत. शहरासाठी हि आनंदाची बाब आहे.

शहराध्यक्ष गंगुले म्हणाले, आमदार काळे यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द सार्थ ठरवला असून तळ्याचे काम मार्गी लावण्यासाठी राजकारणावर मात करीत दिवस-रात्र ते परिश्रम घेत आहे. त्यांच्या या प्रयत्नासून “टाकी मुक्त शहर” होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी विधिज्ञ विद्यासागर शिंदे, प्रशांत वाबळे, डॉ. तुषार गलांडे, माजी नगरसेवक मंदार पहाडे, सुनील शिलेदार फकीर कुरेशी, पदाधिकारी उपस्थित होते.

पालिकेचे पूर्वीचे चार साठवण तलावाचे बळकटीकरण केल्यानंतर व नव्या पाच नंबर तलावाची ४० कोटी लिटरची क्षमता असे सर्व मिळून येत्या वर्षात तब्बल १०८ कोटी लिटर पाणी शहर पुरवठ्यासाठी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे शहरवासियांना दररोज पाणी देऊ शकू — संदीप वर्पे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

loksanvad Avatar