दरोड्यात झालेल्या हत्येच्या निषेधार्थात शेवगावात मुक मोर्चा

शेवगाव प्रतिनिधी, दि . २५ : शेवगावच्या मध्य वस्तीतील मारवाडी गल्लीतील आडत व्यापारी, तथा माहेश्वरी सभेच्या युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष गौरेश बलदवा यांच्या राहत्या घरी झालेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेत त्यांच्या आई श्रीमती पुष्पाताई बलदवा व चुलते गोपिकिसन बलदवा या दोघाची चोरट्यानी निघृण हत्या केली. तसेच त्यांची चुलती श्रीमती सुनिता यांना जबर जखमी केले. त्यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा माहेश्वरी सभा व समस्त ग्रामस्थाच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर आज शनिवारी (दि २४ ) शिस्तबद्ध मुक मोर्चा काढण्यात आला.

        शहरातील बालाजी मंदिरापासून निघालेला हा मुक मोर्चा मुख्य बाजार पेठ मार्गे तहसील कार्यालयावर आल्यानंतर तेथे पार पडलेल्या निषेध सभेत आमदार मोनिकाताई राजळे, परतूरचे  माजी आमदार सुरेश जेठलीया, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस प्रताप ढाकणे,
माजी सभापती डॉ. क्षितीज घुले, ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे, सजय कोळगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, माहेश्वरी सभेचे प्रदेश अध्यक्ष मधुसुदन गांधी, सचिव सत्यनारायण सारडा , महेश सोमाणी, नाशिकचे उमेश मुंदडा, माहेश्वरी सभेच्या महिला जिल्हाध्यक्षा किरण डागा, तिर्थपुरीच्या राधिका झंवर, आंदिनी या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करून पोलिस प्रशासनाने या घटनेचा तातडीने शोध लावावा. तसेच जलद गती न्यायालयाच्या माध्यमातून  गुन्ह्याचा निकाल लावावा. जेणे करून पुढील काळात अशा प्रकारचे कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही अशी कडक शिक्षा व्हावी. तसेच या घटनेची उच्च स्तरीय तपास यंत्रणेमार्फत तपास करण्याची मागणी केली.

          माहेश्वरी समाज शांतता प्रिय असून तो ठराविक चाकोरी बाहेर कधीही जात नाही. मात्र अनेकदा समाज कंटकाकडून समाजातील निरपराध लोकांना लक्ष करण्यात येते. शेवगावातील बलदवा कुटूंबावर झालेला हा आघात राज्यातील तमाम समाज बांधवावर झालेला आहे.  केवळ माहेश्वरी समाजच नव्हे तर शेवगावातील तमाम जनतेला दहशतीतून बाहेर काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने आपले कसब दाखविण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.

        यावेळी राज्यभरातील माहेश्वरी सभेचे पदाधिकारी,  तसेच पाथर्डी, नेवासा, संगमनेर, आकोले ,पैठण, सभाजी नगर, जालना, परभणी, पुणे, नाशिक आदि ठिकाणचे समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष मनेष बाहेती, यांनी सुत्रसंचलन केले. तर तालुकाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम बिहाणी यांनी आभार मानले. संघटनेच्या वतीने दिलेले निवेदन प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार रविंद्र सानप यांनी  स्विकारले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, परिक्षाविधिन आयपीएस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक विलास पुजारी उपस्थित होते.

दरम्यान चोरट्यांच्या जबर मारहाणीला बळी पडलेल्या गोपीकिसन बलदवा व पुष्पाताई बलदवा यांच्या शवविच्छेदनानंतर काल उशिरा  त्यांचे पार्थिवावर येथील अमरधाममध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. गोपीकिसन यांचे पार्थिवावर त्यांच्या इंजिनिअर राहूल व सीए करत असलेल्या रोहित या मुलांनी तर कै.पुष्पाताई यांचे पार्थिवावर त्यांच्या माहेश्वरी सभा युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष, गोसेवक गौरेश यांनी अग्नि संस्कार केले . यावेळी ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, माहेश्वरी समाजाचे जालना जिल्हाध्यक्ष विजयकुमार राठी, बाजार समिनीचे रामनाथ राजापुरे, जगदीश धूत, बंडू रासने, अरुण मुंडे, ओम प्रकाश बिहाणी, माहेश्वरी सभेचे नगर जिल्हाध्यक्ष अतुल डागा, विठ्ठल लालजी असावा, महेश भराडिया, जैन संघटनेचे शांतीलाल बंब आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

        आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या, बलदवा कुटुंबातील दोघांची हत्या झाली. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेचा तातडीने तपास लागावा व आरोपींना पकडून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे  केली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, परिविक्षाधीन अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी. शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना जलद तपास कामाबाबत सूचना दिल्या. त्याच्या पाठपुरावासाठी देखील आपण लक्ष देऊ असे सांगून भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.