विकासाचा हिशोब मागण्याचा अधिकार जनतेला, विवेकशुन्यांना नाही – सुनील गंगुले

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : अडीच वर्षात आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासासाठी ११०० कोटीच्या वर निधी आणला आहे. त्या निधीतून मतदार संघात झालेली विकास कामे जनतेला दिसत आहे. मात्र विकासाची दृष्टी नसलेल्या विवेक शुन्यांना ती विकासकामे दिसत नाही हे मोठे दुर्दैव असून ज्यांचे कोणतेही कर्तुत्व नाही त्या विवेकशुन्यांना विकासाचा हिशोब मागण्याचा अधिकार नाही असा टोला कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी विवेक कोल्हे यांचे नाव न घेता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात लगावला आहे.

प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, मागील पाच वर्षात गल्लीपासून दिल्ली पर्यंत त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना देखील त्यांना पाच वर्षात विकास करता आला नाही.जनतेला गाजर दाखवयाचे आणि निवडणुका जिंकायच्या अशी वृत्ती असलेल्यांचे मनसुबे २०१९ च्या निवडणुकीत उधळले गेले.

मात्र आ. आशुतोष काळे यांनी निवडणुकीपूर्वी शहरातील जनतेला दिला शब्द पूर्ण करून निवडून येताच ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटीचा निधी आणून प्रत्यक्षात ५ नंबर साठवण तलावाचे काम देखील सुरु केल्यामुळे विरोधकांचे शहरातील अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे कुठेतरी जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण करण्यासाठी त्यांचे फार्स सुरु असून मात्र जनता त्यांना आता भुलणार नाही.

ज्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी नाही, आजपर्यंत मतदार संघाच्या विकासात कोणतेही योगदान नाही, जनतेच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नाही ते निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना वेड्यात काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या शाश्वत विकासाची माहिती प्रसिद्धी माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचली आहे व जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

त्यामुळे विरोधकांची चलबिचल वाढली आहे. ज्याप्रमाणे आ. आशुतोष काळे यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला त्याप्रमाणे वाढीव कराचा देखील प्रश्न आ. आशुतोष काळे मार्गी लावतील. हे ज्यावेळी विरोधकांच्या लक्षात आले त्यावेळी त्यांच्या पायाखालची वाळू घसरली.

करवाढ कमी करण्याबाबत योग्य पाठपुरावा सुरु असून वाढीव कर कमी होणार असल्याचे कोपरगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांनी घेतलेल्या बैठकीत जाहीरपणे सांगितले आहे. त्याबाबत प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली असून आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून करवाढ नक्कीच कमी होईल असा नागरिकांना विश्वास आहे.

त्यामुळे विरोधकांचे सुरु असलेले आंदोलन हा फक्त देखावा असून करवाढ व आंदोलनाचा कोणताही सबंध नाही. त्यांना आलेले नैराश्य आम्ही समजू शकतो मात्र विकास कामांचा हिशोब जनता जनार्दन मागेल मात्र विवेकशुन्यांना विकासाचा हिशोब मागण्याचा अजिबात अधिकार नाही असे सुनील गंगुले यांनी शेवटी म्हटले आहे.