झाडे लावा, पर्यावरण वाचवा’ चा संदेश देत सायकल वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : झाडे लावा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरगाव ते पंढरपूर सायकल वारीचे आज गुरुवारी (२० जुलै) सकाळी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले. कोपरगाव सायकलिस्ट क्लबच्या वतीने काढण्यात आलेल्या या सायकल वारीचे हे तिसरे वर्ष असून, यावर्षी या वारीमध्ये ३१ सायकलपटू सहभागी झाले आहेत. ही सायकल वारी २२ जुलैला पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेले हे वारकरी गेल्या दोन वर्षांपासून कोपरगाव येथून सायकलवर पंढरपूरला जात आहेत. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या भक्तिभावाने या सायकल वारीत सहभागी झालेले वारकरी प्रवासात वृक्षारोपण, पर्यावरण संतुलन, पाण्याची बचत, व्यसनमुक्ती व आरोग्य संवर्धनाचे महत्त्व पटवून देतात. त्याचबरोबर उत्तम आरोग्यासाठी चांगल्या सवयी जोपासा असा मौल्यवान संदेश या सायकल वारीद्वारे प्रवासादरम्यान जनतेला दिला जातो. 

 यंदा तिसऱ्या वर्षी ही सायकल वारी गुरुवारी (२० जुलै २०२३) सकाळी ६ वाजता कोपरगाव येथील श्री साईबाबा तपोभूमी मंदिर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या सायकल वारीमध्ये अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, माधवराव आढाव नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय आढाव, प्रशांत होन, विवेक खांडेकर, नितीन त्रिभुवन, संतोष नेरे, संतोष पवार, प्रशांत शहाणे, उमेश लोंढे, प्रशांत निकुंभ, बाळासाहेब निकोले, बापूसाहेब सुराळकर, प्रशांत सुराळकर, अतुल सुराळकर, मनोज आहेर, मोहन आघाव, दीपक बोळीज, कैलास बहिरट, स्वप्नील झावरे, सुधीर खर्डे, महेश थोरे, राजेंद्र निकम, शंकर निकम, मोहन निकम, मनोज कदम, दीपक सुपेकर, संतोष डोखळे, सचिन त्रिभुवन, सचिन शिंदे, सायकल फिटर गंगाराम, चालक असलमभाई आदी सहभागी झाले आहेत.

या सायकल वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकरी बांधवांना संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह अनेकांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या सायकल वारीला शुभेच्छा देण्यासाठी टाकळीचे सरपंच संदीप देवकर, दिनेश कोल्हे, बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, गोदावरी सहकारी दूध संघाचे संचालक विवेक परजणे आदी उपस्थित होते. ही सायकल वारी २२ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर हे सर्व वारकरी सायकलिस्ट कोपरगावच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.

सध्याच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात माणसाचे शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. व्यायामाचा अभाव, सकस आहार घेण्याकडे दुर्लक्ष व आरामदायी जीवन शैलीमुळे शारीरिक व मानसिक आजार वाढत आहेत. सायकल चालवल्याने शरीर अनेक गंभीर आजारांपासून सुरक्षित राहते. शरीराला ऊर्जा मिळते. सायकलिंगमुळे वजन कमी करण्यापासून हाडे मजबूत करण्यापर्यंत आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. शरीर निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज शारीरिक व्यायामाची सवय, सायकल किंवा मैदानी कसरती करणे अत्यंत गरजेचे आहे.

ही बाब लक्षात घेऊन सुदृढ आरोग्यासाठी सायकलिंग व व्यायामाची आवश्यकता, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड व संवर्धन, पाणी बचत, व्यसनमुक्ती याबाबत जनजागृती करत ‘आरोग्यातून अध्यात्म’ असा महामंत्र या सायकल वारीच्या माध्यमातून समाजाला दिला जात आहे. कोपरगाव सायकलिस्ट क्लबने सुरू केलेला हा सायकल वारीचा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे बिपीनदादा कोल्हे, स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी सांगितले. सायकल वारीची ही परंपरा अशीच अखंड सुरू रहावी, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी सायकल वारीतील वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.