पिकविम्याची मुदत वाढली – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : कोपरगाव मतदार संघातील अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे अजूनही पिक विमा अर्ज भरू शकले नाहीत व पिक विमा अर्ज सादर करण्याची मुदत ३१ जुलै पर्यंतच असल्यामुळे असंख्य शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहणार होते. त्यामुळे पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी मागील आठवड्यात दि.२८ जुलै रोजी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत ३ ऑगस्ट पर्यंत वाढविली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून, राज्य शासनाने यावर्षी पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासन भरणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करून पीक विम्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. पिक विमा अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै पर्यंतच देण्यात आलेली होती. 

परंतु पिक विमा अर्ज भरण्यासाठी सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे मतदार संघातील ६० हजाराच्यावर शेतकरी पिकविमा अर्ज भरू शकले नव्हते. जर पिकविमा अर्ज मुदतीत भरला गेला नाही तर हजारो शेतकरी पीक विम्याला मुकणार होते. त्यामुळे पिकविमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी आ. आशुतोष काळे यांनी मागील आठवड्यात राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे मांडल्या होत्या.

त्या पत्राची दखल घेवून शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींची जाणीव ठेवून कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी पिकविमा अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देवून हि मुदत ३ ऑगस्ट पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पिक विम्याचा अर्ज भरलेला नाही. त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पिकविम्याचा अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकविमा अर्ज भरून द्यावे असे आवाहन आमदार काळे यांनी केले आहे. पिकविमा अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून दिल्याबद्दल मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहे.