पाईपलाईन दुरुस्त करुन नागरिकांना स्वच्छ पाणी द्या, राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०९ : कोपरगाव शहरातील खडकीसह अनेक उपनगरांमध्ये गाळमिश्रित व दूषित पाणी पुरवठा होत असून, कोपरगाव नगरपरिषदेने त्वरित पाईपलाईन दुरुस्त करून, नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशा आशयाचे निवेदन नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील खडकीसह अनेक उपनगरातील नागरिकांना काही दिवसांपासून गाळमिश्रित व दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या बाबीची कोपरगाव नगरपरिषदेने गांभीर्याने दखल घेवून ज्या पाईप लाईन लिकेज होवून गाळ मिश्रीत पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची त्वरित दुरुस्ती करुन दुषित पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा.

लवकरच ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण होवून, अशा अडचणी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे तोपर्यंत तरी कोपरगाव नगरपरिषदेने नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा होईल, याची काळजी घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, डॉ. तुषार गलांडे, संदीप कपिले, गणेश बोरुडे, राजेंद्र जोशी, सलीम पठाण, संतोष शेलार, विकास बेंद्रे, चंद्रकांत धोत्रे आदी उपस्थित होते.