आमदार काळेंची मतदार संघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : गुरुवार (दि.१७) रोजी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे संपन्न झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने आ. आशुतोष काळे यांनी स्वागत केले.

तत्पूर्वी सकाळी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व शालेय शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर यांच्या समवेत मुंबई ते काकडी विमान प्रवास केला.

यावेळी मतदार संघाच्या विकासाच्या विविध समस्या व अडचणी बाबत आ. आशुतोष काळे यांनी मंत्री महोदयांशी सविस्तरपणे चर्चा करून मतदार संघाच्या विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्ये रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आदी मुलभूत विकासाची बहुतांशी कामे मागील चार वर्षात सोडविली असून मतदार संघातील नागरिक विकासाच्या बाबतीत समाधानी आहे. तरी देखील मतदार संघाच्या उर्वरित विकास कामांना निधी मिळावा यासाठी शासन दरबारी प्रस्ताव सादर केलेले असून, अनेक प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहेत.

यामध्ये काकडी परिसरात एम.आय.डी.सी. उभारावी, विमानतळ विकास कामांसाठी निधी वर्ग करावा, सिंचनासाठी तातडीने आवर्तन मिळावे, शेती महामंडळाच्या जमिनी पाणी पुरवठा योजना व घरकुल मिळावी, कोपरगाव शहरात नवीन क्रीडा संकुलासाठी निधी मिळावा, गोदावरी नदी संवर्धनसाठी निधी मिळावा, मागील वर्षी झालेल्या सततच्या पावसाचे अनुदान मिळावे, मंजूर को. प. बंधारा बांधण्यासाठी निधी मिळावा, रांजणगाव देशमुख स्वतंत्र महसूल मंडल करावे.

कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्गाला गती द्यावी, कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी बीज गुणन क्षेत्राची ५ हेक्टर जमीन मिळावी, तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास निधी मिळावा, उजव्या-डाव्या कालव्याला दुरुस्ती कामासाठी निधी मिळावा, सबजेल इमारतीसाठी निधी मिळावा, आदिवासी भवन साठी निधी मिळावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवीन वसतिगृहासाठी निधी मिळावा.

अशा अनेक मागण्या आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचेकडे केल्या. सदर मागण्यांना सर्वच मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देवून कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही सर्वच मंत्री महोदयांनी दिली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.