शेतकऱ्यांनी येत्या २५ ऑगस्टपर्यंत ई-पीक पाहणी करून घ्यावी – स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : गेल्या अडीच महिन्यांपासून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून, उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी येत्या २५ ऑगस्टपर्यंत ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.

स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांचा प्रादुर्भाव व इतर कारणांमुळे पेरणी ते काढणीपश्चात पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ सुरू केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेत बदल करून राज्यात ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच राज्‍य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे. त्‍याची अंमलबजावणी यंदाच्‍या खरीप हंगामापासून सुरू झाली आहे. यापूर्वी पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, आता शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा काढून मिळणार असून, सरकारच आता पीक विम्‍याची रक्‍कम भरणार आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिकांसाठी संरक्षित असणारी रक्कम मिळणार आहे. 

मागील दोन-अडीच महिन्यांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातदेखील गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाने विश्रांती घेतली असून, पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची चिन्हे आहेत.

सद्य:स्थितीत पर्जन्यमान कमी असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पावसाअभावी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट २०२३ रोजी काकडी येथील शिर्डी विमानतळ परिसरात झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य संकट लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आश्वस्त केले आहे.

शेतकऱ्यांवर संकट ओढवले तर सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत करेल व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात घाबरू नये, अशा शब्दांत स्नेहलता कोल्हे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. 

यंदाच्या खरीप हंगामात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोपरगाव तालुक्यातील जवळपास ३३ हजार ४८८ तर मतदारसंघात येणाऱ्या राहाता तालुक्यातील पुणतांबा मंडळातील ११ हजार ५७४ शेतकऱ्यांनी बाजरी, मका, सोयाबीन, कापूस, तूर, भुईमुग, कांदा आदी पिकांची पेरणी केलेली आहे. मतदारसंघातील सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज भरले आहेत.

दुष्काळ, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या उत्पनात घट आल्यास सरकारच्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांना आगाऊ नुकसान भरपाई देण्यात येते. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पावसाची परिस्थिती ध्यानात घेऊन शेतकऱ्यांनाही शासनाच्या धोरणानुसार पीक विम्यापोटी आगाऊ नुकसान भरपाई देण्याची तसेच यासाठी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फत त्वरित पंचनामे करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे केली असल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले. 

यावर्षी कोपरगाव मतदारसंघात आजपर्यंत अत्यल्प पाऊस झाला असून, दोन-अडीच महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाने केलेल्या आवाहनानुसार एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी करून घ्यावी. ई-पीक पाहणी करून घेण्याची मुदत ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत असली तरी पुढे काही अडचणी येऊ नये, त्रुटी राहू नये म्हणून तातडीने २५ ऑगस्टपर्यंत ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन स्नेहलता कोल्हे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.