सापांना मारण्याऐवजी सर्पमित्रांना कळवा- सर्पमित्र लाकडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : निसर्गातील महत्त्वाचा घटक आणि परिसंस्थेतील एक महत्त्वाचा दुवा म्हणून सापांची ओळख आहे. हे मूल्य जाणूनच भारतीय संस्कृतीने सापांना पूजनीय बनविले आहे. परिणामी नागपंचमीच्या दिनानिमित्ताने का होईना सापांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जाते.

हा दिन साजरा करण्याचा उदात्त हेतू बाजूला सारून नाग किंवा सापाला दूध पाजणे, त्यावर हळद-कुंकू टाकून त्याची पूजा करणे यासारख्या अंधश्रद्धायुक्त प्रथा पाळल्या जातात. साप दूध पित नाही किंवा त्यावर हळद-कुंकू टाकू नये, याचा प्रचार आणि प्रसार दरवर्षी केला जात असला तरी रुढींच्या आधीन गेलेल्या या बाबी कमी होत नाहीत असे मत जे. बी. एस. एस पर्यावरण संस्थेचे प्रदेशाध्यक्ष संतोष लाकडे यांनी व्यक्त केले.

येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल व राष्ट्रीय हरित सेना आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या सापांची माहिती दिली. सर्प हे पर्यावरणामध्ये आवश्यक आहेत. एखादेवेळी आपल्या घरामध्ये एखादा साप निघाला तर त्याला न मारता सर्प मित्रास तो पकडण्यास सांगावे. असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी सर्पमित्र संतोष लाकडे, विशाल गोरे यांचा विद्यालयाचे वतीने सन्मान करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड, उपप्राचार्य लक्ष्मण सोळसे, पर्यवेक्षिका छाया शिंगटे तसेच हरित सेना विभाग प्रमुख नितीन भुसारी, विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बाळासाहेब गव्हाळ यांनी सुत्रसंचलन केले तर रामनाथ काळे यांनी आभार मानले.