तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : शेवगाव तालुक्यात तब्बल तीन आठवड्या पासून पावसाने हुलकावणी दिल्याने पिके अडचणीत सापडली आहे. पावसाच्या भरवशावर जून मध्येच कपाशी, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली गेली. मात्र पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.

शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर खरीप पेरण्या केल्या, खतांचे डोस दिले. फवारणी, खुरपणी केली मात्र यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके सुकून चालल्याने झालेला खर्च तरी निघेल का या चिंतेने शेतकरी भयभीत झाला आहे. 

सध्या कांद्याचे भाव गडगडले आहेत. कांदा अनुदान अजूनही प्रतीक्षेत आहे. गेल्या वर्षीची अतिवृष्टीची मदतही अद्याप मिळाली नाही. सुलतानी धोरणामुळे व आता निसर्गाच्या फटक्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी खरीपासाठी उधार उसनवारी करून मोला महागाचे बियाणे मातीत गाडले. त्यावर खत टाकण्याचे धाडसही दाखवले. परंतु दुर्दैवाने वरूण राजाने पाठ फिरवल्याने हवालदिल झालेला बळीराजा पावसाची आणि शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करीत आहे.

       तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६०० मि.मी असून तालुक्यात आज अखेर केवळ २१६मी. मी वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या केवळ ३६ टक्के  आहे तालुक्यातील एरंडगाव., ढोरजळगाव मंडळात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तालुक्याचे खरीपाचे सरासरी क्षेत्र ८४ हजार ९७९ हेक्टर असून यंदाच्या हंगामात उद्दिष्ट क्षेत्राच्या सुमारे १२०% पेरण्या झाल्या आहेत.

तालुक्यात कपाशी ४६ हजार ६७१ हेक्टर, तुर ९ हजार २३६ हेक्टर, बाजरी १ हजार ७५९ हेक्टर, सोयाबीन १ हजार ४२७ , मूग ३८ ६, भुईमूग २६८, कांदा २६०  हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. तालुक्यात कोठेही पाऊस नाही आता पाऊस झाला तरी उत्पादनात वाढ होणार नाही. एकंदरीत तालुक्यात पाऊस नसल्याने झालेला खर्च ही वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे.