पंधरा वर्षाच्या मुलाचा विजेचा शॉक बसून जागेवर मृत्यू

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : तालुक्यातील मुर्शदपूर येथील पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलाचा औत हाकताना विजेचा शॉक बसून जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत समजलेली थोडक्यात माहिती अशी, चैतन्य जनार्दन ढाकणे (वय-१५) हा इयत्ता आठवीतील शाळकरी मुलगा रविवारी सुट्टी असल्यामुळे सकाळच्या वेळेस शेतात पाळी घालण्यासाठी औत घेऊन शेतात गेला होता. 

दुर्दैवाने एक विजेचे वायर औताखाली आल्यामुळे विजेचा करंट लोखंडी औतात उतरला आणि चैतन्यला जोराचा शॉक बसल्याने तो जागेवर खाली कोसळला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याचा अगोदरच मृत्यू झाल्याचे घोषित केले. शेवगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.