शब्दाचा खेळ करत सरकार व राजकारण्यांनी धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : धनगर आणि धनगड अशा शब्दाचा खेळ करत वेळोवेळी राज्य सरकार व राजकारण्यांनी धनगर समाजाला आपल्या हक्कापासून वंचित ठेवले. आता धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. समाजातील सर्वांना तसे दाखले मिळावेत. वटहुकूम काढून हा प्रश्न लगेच मार्गी लावावा.

अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा तालुक्यातील धनगर समाजाने दिला आहे. समाजाच्या एसटी प्रवर्गाचे अंमलबजावणी बाबत सकल धनगर समाजाच्या वतीने आज सोमवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

        यावेळी पार पडलेल्या निर्धार सभेत ज्येष्ठ नेते जगन्नाथ गावडे, बाजार समितीचे उपसभापती गणेश खंबरे, आत्माराम कुंडकर, विनायक नजन,  गणेश कोरडे, भाऊसाहेब कोल्हे, पोपट राशीनकर, बाबासाहेब बनसोडे, बाजीराव लेंडाळ सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी  तालुक्यातील कांबी येथील कार्तिक  होळकर व शेवगावच्या  आरोही  डोईफोडे या चिमुकल्यांनी आपल्या ओघवत्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ” येळकोट जय मल्हार, ” आरक्षण आमच्या हक्काचे,  ते आम्ही मिळवणारच.” आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. राजेंद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षाविधीन तहसीलदार राजेंद्र सानप यांनी निवेदन स्वीकारले.