विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण झाली पाहिजे – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०३ : राज्यात महायुतीचे शासन आल्यानंतर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून ही विकास कामे दर्जेदार व वेळेत कशी पूर्ण होतील याकडे अधिकार्‍यासह सर्वांनी सतर्क राहून लक्ष द्यावे. असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.                  

अर्थसंकल्प २०२३ अंतर्गत शेवगाव ते तळणी देवी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण व सालवडगाव ते मूर्शतपूर(धावणवाडी) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण या विकास कामांचा शुभारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह. भ. प. रमेश महाराज डमाळ होते, यावेळी बापू पाटेकर, सुनील रासने, राजू सुरोसे, मनसे तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, नगरसेवक महेश फलके, नितीन दहिवाळकर, कमलेश गांधी, भाजपा सरचिटणीस भीमराज सागडे, तळणीच्या सरपंच शोभाताई झिंज, रामहरी घुले, उपसरपंच दादा घनवट, बाळासाहेब महाडिक, बाळासाहेब घुले, अनिल भिसे,

मुरलीशेठ धुत, लक्ष्मणराव टाकळकर, गंगा खेडकर, कैलास सोनवणे, संतोष कंगनकर, सुभाष भागवत, सुभाष बडदे, महादेव पवार, एकनाथ खोसे, जावेद शेख,  मारुती भागवत, शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, बाळासाहेब फटांगडे,  अमोल देवडे, अरुण धस, जगन्नाथ भागवत, संदीप जावळे, मीना कळकुंबे, जलील राजे, सोमनाथ लोखंडे, मुरलीधर धस, बाळासाहेब झिरपे, उपअभियंता प्रल्हाद पाठक, ठेकेदार फुलचंद रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या- या अगोदर दोन-तीन वर्ष विकास कामांसाठी निधी मिळत नव्हता, परंतु राज्यात आपले सरकार आल्याने निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे. सध्या रस्त्यांची व जलजीवन मार्फत अनेक गावात पाणी योजनांची कामे सुरु आहेत, विकास कामासाठी निधी मिळतो, कामे होतात मात्र ती दर्जेदार व्हावीत याकडे अधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे.

कारण काही त्रुटी राहिल्यास लोकप्रतिनिधी व प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागते, तसेच एका कामासाठी एकदा निधी मिळाल्यानंतर पुढील १५-२० वर्ष त्या कामासाठी निधी मिळत नाही. विजेच्या प्रश्नासाठी शासनाने प्रत्येक गावात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीने व शेतक-यांनी जागा उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले.