शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा – प्रशांत सांगडे

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ : तालुक्याच्या जवळपास सर्वच भागात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. यंदाच्या ऐन पावसाळ्यातच पावसा अभावी अगोदरच दुष्काळी परिस्थितीच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना गेल्या तीन-चार दिवसात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणखी बेजार केले. शेवगावच्या सर्वच्या सर्व सहा मंडळात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसह खरिपाच्याही विविध पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली.

तालुक्यातील भातकुडगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, तूर, कपाशी आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी तुरीला शेंगा लागल्या तर अनेक ठिकाणी शेतातील उभा ऊस आडवा झाला. काढणीला आलेल्या कापूस, तुर, कांदा, टोमटो, डाळिंब,  लिंबू, केळी आदि पिकांचे नुकसान झाले. 

रविवारी व बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुस्कानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनास  दिल्या, त्यानुसार कामगार, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिले आहेत. 

गुरुवार अखेर तीन दिवसात मंडल निहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे चापडगाव ६४ मिमी, एरंडगाव ५६, बोधेगाव ६४, शेवगाव ४७, ढोरजळगाव ३७, भातकुडगाव मंडळात रविवारी ७६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यांनंतरची आकडेवारी उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.