निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रात पोहोचल्याचे समाधान – स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : निळवंडे धरणातून वाढीव दीड टीएमसी पाणी देण्याची मागणी आपण उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार निळवंडे डाव्या कालव्यातून हे पाणी कोपरगाव मतदारसंघातील लाभक्षेत्रात पोहोचले आहे. त्या पाण्याने मतदारसंघातील दुष्काळी गावांतील पाझर तलाव, साठवण बंधारे भरले आहेत. पाच दशकांच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे धरणाचे पाणी कोपरगाव मतदारसंघातील दुष्काळी गावांत आल्यामुळे या भागातील जनतेचे व शेतकऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. याचा आपल्याला मनस्वी आनंद झाला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले. 

माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नातून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यातून कोपरगाव मतदारसंघातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, वेस, सोयगाव, बहादरपूर, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद, वाकडी, चितळी, धनगरवाडी आदी गावांतील पाझर तलाव, बंधारे, ओढे भरून देण्यात आले आहेत. त्यामुळे या गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. त्याबद्दल या गावातील ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी (२२ डिसेंबर) स्नेहलताताई कोल्हे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी निळवंडेच्या कोपरगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील जलसाठ्याचे स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तानाजी पाटील पाडेकर होते. यावेळी नानासाहेब गव्हाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, वेस येथील सरपंच जयाताई माळी, उपसरपंच आनंदा भडांगे, मनेगावचे अण्णासाहेब गांगवे, दिगंबर कांडेकर, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब गोर्डे, भाऊसाहेब सोनवणे, शिवराम गुंजाळ, चांगदेव पाडेकर, प्रकाश गोर्डे, जालिंदर कोल्हे, चंद्रभान गुंजाळ, बाबासाहेब नेहे, राजाभाऊ कोल्हे, रामदास भडांगे, विजय डांगे, सुमित कोल्हे, प्रवीण घारे, नितीन पाचोरे, अमोल खालकर, प्रमोद गोसावी, आबासाहेब पाडेकर, बंडूभाऊ थोरात, दत्तात्रय गुंजाळ, नवनाथ आरणे, नारायण गव्हाणे, बाळासाहेब काकडे, एकनाथ दरेकर, प्रभाकर गोसावी, अशोक म्हाळसकर, बाबासाहेब गुडघे, रामनाथ सहाणे, रामनाथ गव्हाणे, प्रकाश गव्हाणे, अर्जुन गोसावी, त्र्यंबक वर्पे, सचिन चासकर, दशरथ कोटकर, संदीप रणधीर, अनिल शिंदे, सोमनाथ वर्पे यासह रांजणगाव देशमुख, मनेगाव, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, बहादराबाद, शहापूर, काकडी, मल्हारवाडी व पंचक्रोशीतील ग्रा. पं. सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, प्रदीर्घ संघर्षानंतर निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळग्रस्त कोपरगाव मतदारसंघात आले आहे. पाणी असेल तर जीवन आहे, याची माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांना जाणीव होती. पाण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. पाणी व शेतकरी हितासाठी त्यांनी सातत्याने परखड भूमिका घेतली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कायमस्वरूपी दुष्काळी भागाला निळवंडे धरणाचे पाणी मिळून हा भाग सुजलाम सुफलाम व्हावा, असे स्व. कोल्हेसाहेब यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून कोपरगाव मतदारसंघातील जवळके, रांजणगाव देशमुख, बहादरपूर, अंजनापूर, वेस, सोयगाव, बहादराबाद, धोंडेवाडी, शहापूर, काकडी, मल्हारवाडी या ११ गावांचा निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात समावेश करवून घेतला.

निळवंडेच्या कालव्याची कामे पूर्ण व्हावी म्हणून मी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केले. स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांचा जनसेवेचा व संघर्षाचा वारसा पुढे चालवत निळवंडेच्या पाण्यासाठी बिपीनदादा कोल्हे, विवेक कोल्हे व आपण स्वत: शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. काही मंडळी आम्हीच निळवंडेचे पाणी आणि वस्तुस्थिती बाबत मनाचे तर्क लावून अपप्रचार करून राजकारण करतात ; पण जनतेचा अशा असत्यावर आधारित प्रचार करणाऱ्या मंडळींच्या म्हणण्यावर विश्वास नाही. जरीही कुणी अफवा पेरल्या तरी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. सत्कारापेक्षा सत्कार्याला महत्त्व असते. श्रेय वादासाठी गवगवा न करता खरे काम केले पाहिजे. आपल्याला जनतेमुळे सत्तेची खुर्ची मिळाली आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो, जनतेच्या अडचणी दूर करणे हे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव प्रत्येक पदावर असणाऱ्या व्यक्तीला असली पाहिजे असे सौ.कोल्हे म्हणाल्या.

कोपरगाव मतदारसंघातील निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्वच गावांना निळवंडे धरणाचे पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील निळवंडे धरणाच्या वितरिका (चाऱ्या) व उपवितरिका (पोटचाऱ्या) व सिंचन व्यवस्थेची कामे तातडीने पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत निळवंडेचे पाणी शेतशिवारात पोहोचत नाही तोपर्यंत मी शासनाकडे पाठपुरावा करत राहीन, अशी ग्वाही कोल्हे यांनी दिली.

भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे म्हणाले, स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे निळवंडे डाव्या कालव्याचे काम मार्गी लागले आहे. स्नेहलताताई कोल्हे यांनी आमदार असताना केलेल्या आग्रही मागणीवरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी डाव्या कालव्याच्या कामासाठी ११७२ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. निळवंडेच्या डाव्या कालव्याचे पाणी कोपरगाव मतदारसंघातील लाभक्षेत्रातील ‘टेल टू हेड’ पर्यंत सर्वच गावांना मिळवून देन्यात इतर लोक अपयशी ठरले कारण त्यांच्या निष्क्रियतेमुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील ११ गावांना पहिल्या आवर्तनाचे पाणी मिळाले नाही.

आमच्या ११ गावांतील लोकांच्या मतासाठी विरोधकांनी कोल्हे यांच्यावर निराधार आरोप करण्यात रस घेतला; निळवंडेचे पाणी कोपरगावला चालले, असा धादांत निराधार अपप्रचार करून त्यांनी या भागातील लोकांची फसवणूक केली.पाणी दृष्टिक्षपात येताच निळवंडे पाण्याने साठवण तलाव भरून मिळावे यासाठी आम्हाला उपोषण आंदोलन करून हक्काच्या पाण्यासाठी लढावे लागले त्यात फक्त नावाला खोटी आश्वासने देणारे कुठेही दिसले नाहीत मात्र पाणी येताच आम्ही आणले असे श्रेय घेण्यासाठी पुढे आले. खऱ्या अर्थाने संकट आम्हाला काळी स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नामुळे निळवंडेच्या डाव्या कालव्याचे पाणी कोपरगाव मतदारसंघात ‘टेल टू हेड’ पर्यंत मिळाले असल्याचे सांगून राहणे यांनी या भागातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याबद्ल कोल्हे यांचे आभार मानले. 

विक्रम पाचोरे म्हणाले, निळवंडे धरण व कालव्याचे काम मार्गी लागावे म्हणून कोल्हे कुटुंबीयांचे खूप मोठे योगदान आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या संघर्षामुळे व प्रयत्नामुळे कोपरगाव मतदारसंघातील जिरायती भागात निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी आज आले आहे. सूत्रसंचालन बाबासाहेब नेहे तर प्रास्ताविक विक्रम पाचोरे यांनी केले तर सुमित कोल्हे यांनी आभार मानले.