विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ : तालुक्यातील कऱ्हेटाकळी येथे बहिणीकडे कार्यक्रमासाठी आलेल्या १८ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना, बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. वैभव गोरक्षनाथ वीर (रा.ताजनापुर) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे.

बहिणीकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने तो युवक कऱ्हेटाकळी येथे आला होता. यावेळी मंडपाच्या खांबात विजेचा प्रवाह उतरल्याने, विजेचा धक्का लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी उशिरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग वीर यांनी सांगितले.