पाच वर्ष विकास केला असता तर, माजी आमदारांवर कोल्हे कुई करायची वेळ आली नसती – संदीप कपिले

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : – गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार असतांना देखील कोपरगाव शहराच्या हद्दवाढीचा तर सोडाच पण, शहराचा विकास देखील तुम्हाला करता आला नाही. शहरातील नागरिकांना गाजर दाखवण्यातच तुमची पाच वर्षे कुठे गेली ते तुम्हाला समजलेच नाही. त्यामुळे आता कोल्हे कुई करून काय उपयोग नाही. तुम्ही पाच वर्ष विकास केला असता तर, आज तुमच्यावर तुमच्या निष्काळजी नगरसेवकाच्या माध्यमातून कोल्हे कुई करायची वेळ आली नसती अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप कपिले यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हेंवर केली आहे.

 आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच कोपरगाव शहराच्या विकासासाठी दिलेल्या निधीतून कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्याचबरोबर हद्दवाढ झालेल्या भागाचा देखील विकास व्हावा यासाठी त्यांनी १० कोटीचा निधी दिला आहे. हद्दवाढ होण्यापूर्वी व हद्दवाढ झाल्यानंतर त्या भागातील नागरिकांनी आजपर्यंत काय त्रास सोसला याची जाणीव आ.आशुतोष काळे यांना झाली होती.

त्यामुळे त्यांनी हद्दवाढ झालेल्या भागासाठी १० कोटी निधी आणला आहे. मात्र, ज्यांच्याकडे पाच वर्ष सत्ता होती. केंद्रात व राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार होते त्यांना निधी आणता आला नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. त्यांच्या निष्काळजी नगरसेवकांनी कधी हद्दवाढ झालेल्या भागात ढुंकून देखील पाहिले नाही. त्यामुळे त्यांना आता कोल्हे कुई करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.

तुमची खरी पोटदुखी वेगळीच आहे. आ.आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलावाचा कोपरगाव नगरपरिषदेला द्यावा लागणारा १५ टक्के निधी शासनाकडून आणला आहे. ज्यांना सर्व प्रकारची सत्ता असतांना निधी मिळविता आला नाही. त्या माजी आमदार कोल्हे आ. आशुतोष काळे यांनी केलेले प्रत्येक काम मीच केले अशी टिमकी सातत्याने वाजवत आल्या आहे. त्यांना मात्र, या १५ टक्के निधी बाबत टिमकी वाजवता येत नाही हे त्यांचे खरे दुःख आहे.

आ.आशुतोष काळे यांनी चार वर्षात कोपरगाव शहराचा विकास करून दाखवला आहे. त्यामुळे कोपरगाव शहराचा चेहरा बदलला आहे हे कोपरगाव शहराची जनता जाणून आहे. त्याच बरोबर हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांना देखील सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी १० कोटी निधी आणला आहे. मात्र, ज्यांचा याच्याशी काडीचा सबंध नाही. त्यांची श्रेय घेण्यासाठी धडपड केविलवाणी आहे. त्यामुळे आपले प्यादे पुढे करून त्यांची कोल्हे कुई अद्यापही सुरू आहे.

आ. आशुतोष काळे त्यांनी केलेल्या कामाची प्रसिद्धी करीत आहेत हा त्यांचा अधिकार आहे. हे काम आशुतोष काळे यांनी केले आहे याची जनतेला देखील जाणीव आहे. मात्र, विरोधकांना आपण कुठेतरी दूरवर जातोय याची खंत वाटत असल्यामुळे कोल्हे कूई करून नागरिकांमध्ये संभ्रम पसरविण्याचे काम माजी आमदार कोल्हे करीत आहे. मात्र, अशा कोल्हे कुई मुळे तुम्हाला कोपरगावकर खरच श्रेय देणार आहे का? याचे आत्मपरीक्षण करा. तुम्ही म्हणता शासनाला निधी द्यावाच लागतो तर तुम्हाला निधी का आणता आला नाही.

हा प्रश्न निष्क्रिय नगरसेवकांनी आपल्या निष्क्रिय आमदारांना विचारा चार वर्षात विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहराचा झालेला कायापालट व तुमच्या कार्यकाळात विकसाच्या बाबतीत कोपरगावची झालेली पीछेहाट त्यामुळे नागरिकांना झालेला त्रास कोपरगावकरांनी अनुभवला आहे. त्यामुळे तुमच्या कोल्हे कुईला कोपरगावकर आता कंटाळले आहे. त्यामुळे ही कोल्हे कुई आता थांबवा असा उपरोधिक सल्ला संदीप कपीले यांनी माजी आमदार कोल्हे यांना दिला आहे.