पर्यावरणाला ईजा न पोहचता मकरसंक्रांत उत्सव साजरा करा – सुशांत घोडके

 कोपरगाव प्रतिनिधी दि. ४ : मकरसंक्रांत निमित्ताने देशात काही ठिकाणी तर महाराष्ट्र राज्यात पतंगबाजी करुन उत्सव साजरा केला जातो. आपलाच पतंग दिर्घकाळ हवेत रहावा या स्पर्धेतून गत १२-१५ वर्षीपासून पासून नायलॉन धागा वापरण्यास पतंगोत्सव काही प्रेमींनी सुरुवात केली. याचे गंभीर परिणाम मनुष्य, पशू-पक्षी यांना गंभीर शारीरिक इजा पोहचण्यास सुरुवात झाली. अनेक पक्षी-पशू आणि काही मनुष्यांना जीवही गमवावा लागला आहे. पतंगबाजीत पारंपरिक साधा धागा वापरुन मकरसंक्रांत उत्सव साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी केले आहे. 

पतंगबाजीत नायलॉन धागा बंदी राज्यातील अनेक नागरिक तसेच पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके हे अनेक वर्षांपासून लोकांमध्ये जनजागृती करत आहेत.याबाबत त्यांनी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार तत्कालीन प्रसंगी नायलॉन विक्रेते तात्पुरती कारवाई संबंधितांवर झाली होती.परंतू कायम स्वरुपी उपाय व्हावा म्हणून पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना नायलॉन धागा (मांजा) प्रतिबंधात्मक कारवाई व बंदी घालण्यासाठी पत्र पाठवले होते. या बाबत मुख्यमंत्री यांनी दखल घेतली असून या संदर्भात पर्यावरण विभागाला कळवले आहे. तसेच राज्यात प्रतिबंधात्मक कारवाई सुरु करण्यात आली असून नासिक विभागीय आयुक्तांनी नासिक, जळगांव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, महापालिका आयुक्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना नायलॉन धागा विक्रेते यांचेवर कारवाई बाबत सुचना दिल्या आहेत.

पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात १) नायलॉन धागा (मांजा) उत्पादक कारखाने व विक्रेते यांचेवर बंदी आणून त्याचा उपयोग योग्य कारणासाठीच होणे कामी विशिष्ट नियमावली आखून त्याचे प्रशासनामार्फत काटेकोर पालन व्हावे.२) तातडीचा उपाय म्हणून राज्याचे मा.मुख्य सचिव, नगरविकास सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक, वन व पर्यावरण विभाग अधिकारी यांची संयुक्त बैठक होवून राज्यात छुप्या मार्गाने वितरित असलेला नायलॉन धागा जप्त करून संबंधितांवर कारवाई व्हावी.

३) महाराष्ट्र शासना मार्फत पतंग उत्सवा दरम्याने साधा धागा वापरण्याचे आवाहन करून पतंगावर स्वच्छता अभियान, ओला- सुका-घरगुती घातक वर्गीकरण, पाणी वाचवा, बेटी बचाओ-बेटी पढाओ,झाडे लावा – झाडे जगवा. असे सामाजिक संदेश देण्याचे आवाहन नागरिकांना करावे.जेणे करून सामान्य नागरिकांना उत्सवाचा खरा आनंद घेता येईल. आपण या बाबत दखल घेवून मनुष्य, पशू-पक्षी यांना होणाच्या हानी पासून परावृत्त कराल अशी अपेक्षा पत्रात व्यक्त केली होती.याबाबत नायलॉन धागा विक्रेते यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरु झाली आहे.

मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे एक आख्यायिका आहे. तमिळच्या तंदनान रामायणानुसार भगवान श्रीरामांनी मकरसंक्रांतीवर पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली. असे म्हटले जाते की, भगवान श्रीरामांनी उडवलेला पतंग थेट स्वर्गात पोहोचला. स्वर्गात पतंग इंद्राचा मुलगा जयंत याच्या पत्नीला सापडला. त्याला पतंग खूप आवडला आणि तो त्याने आपल्याकडे ठेवला. जयंतच्या पत्नीने विचार केला की, ज्याचा हा पतंग आहे तो घायला नक्कीच येईल.

तिकडे भगवान रामाने हनुमानजीला पतंग आणण्यासाठी पाठविले. हनुमानजींनी जयंतच्या पत्नीला पतंग परत करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी भगवान रामला भेटण्याची इच्छा केली. ती म्हणाली की, ती श्रीरामांच्या दर्शनानंतरच पतंग परत करेल. हनुमानजींनी भगवान रामाला संपूर्ण प्रसंग सांगितला. भगवान राम म्हणाले की, ती मला चित्रकूटमध्ये पाहू शकेल आणि हनुमानजीला पुन्हा हा आदेश देण्यासाठी पाठविले. जयंतच्या पत्नीला स्वर्गात जाऊन हनुमानजींनी भगवान रामाचा आदेश सांगितला. त्यानंतर त्यांनी पतंग परत केला.

पतंगाचा शोध प्राचीन आहे. चीनमध्येही पतंगबाजी सुरुवात असल्याचे उल्लेख आढळतात. बेंजामिन फ्रॅन्कलिन या शास्त्रज्ञाने ढगांमध्ये विद्युत उर्जा असतात हे पतंगाच्या दोराला धातूच्या तारा बांधून सिद्ध केले होते. पतंग हा एक पंखच आहे. पतंगाला दोन समान भाग असतात. हे भाग सारख्या आकाराचे असल्याने पतंग समतोल बनतो. पतंगाच्या काड्या, शेपूट व आकार यावर पतंग कसा उडेल हे ठरते. पतंग हवेमुळे वर आकाशात जातो. वाऱ्याचा वेग मर्यादित स्वरूपात असेल तर पतंग चांगले उडतात. पतंगाचे निमुळते टोक त्याला हवेत वर जाण्यास मदत करते. वर जातांना पतंगाचा उडण्याचा कोन वाऱ्याला अडवतो व त्याचे दोन भाग करतो. पतंगाच्या वर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. पतंगाच्या खालील बाजूला जास्त दाबाचा पट्टा म्हणजेच हवेची उशी तयार होते. पतंगाचा मांजा (दोरा) पतंगाला ओढ देतो त्यामुळे पतंग खालील भागात असलेल्या हवेच्या उशी स्वार होतो. त्यामुळे तो खालून वर ढकलला जात राहतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा केवळ धार्मिकच नाही तर त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. तसे पाहिले गेले तर पतंग उडवण्यामुळे हात व पायांचा व्यायाम होतो. मकर संक्रांतीचा सण थंडीमध्ये पडल्याने शरीराला उर्जा देखील मिळते. सूर्यप्रकाशात राहिल्यास ड जीवनसत्व (व्हिटॅमिन डी) देखील मिळते. या व्यतिरिक्त सर्दी खोकला यापासून बचाव होतो.पतंग उडवणे आनंद घेऊन येते,परंतु काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 

मकरसंक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.याचे स्वागत पतंगबाजी करुन करतात.मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे. पतंग उडवणे हा या उत्सवातील विधी आहे. प्रत्येकजण मुले किंवा तरूण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. सकाळपासूनच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग दिसतात. बर्‍याच ठिकाणी भव्य पतंगोत्सव देखील आयोजित केला जातो आणि स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.

पतंगबाजीत पतंग दिर्घकाळ हवेत ठेवण्याची प्रथा रुढ आहे.स्वत: तयार केलेले आकर्षक पतंग आणि त्याला उंच हवेत नेण्यासाठी जोडलेला धागा साधा असायचा.दिवसेंदिवस पतंगबाजीच्या स्पर्धेने विकृत रुप धारण केले.साधा पारंपरिक धागा ऐवजी हाताने नतुटणारा धागा व त्याला काच लावली जावू लागली.पतंगबाजीत हा ही धागा प्रतिस्पर्धीला हरविण्यात कच्चा आहे.असे समजुन पतंगबाजी करणारे यांनी नायलॉन, चिनी धागा वापरण्यास साधारण १२ ते १५ वर्षांपूर्वी सुरुवात केली.

नायलॉन, चिनी धागा पतंगबाजी स्पर्धेत तुटून पतंगासोबतचा धागा रस्त्यावर आला.त्याने रस्त्यावर चालण्या-या मनुष्याला इजा पोहचवली.अनेक दुचाकी स्वारांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. तर गळ्याला तीव्र दुखापत झालेल्या काहींनी जीवही गमवावा लागला. झाडावर हा धागा गुंतागुंत होवून पडला तेव्हा स्वच्छंद विहारुन पुन्हा झाडावर आलेले पक्षी जायबंदी झाले.त्यांची सुटका न झाल्याने जखमी अवस्थेत जीव गमावला आहे. अती दाबाच्या वीजे तारांवर अडकून पडलेले पतंग सोडविताना पतंग प्रेमींच्या हालगर्जीपणामुळे वीजप्रवाहीत तार एक मेकांवर घासून शाॅकसर्किट झाले. संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे. 

याबाबत पर्यावरण विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शनानुसार प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करून बनविण्यात आलेल्या व साधारणपणे नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्यामुळे पक्षी व मानव जीवितांस इजा पोहचली जाते. काही प्रसंगी त्या इजा प्राण घातक ठरतात. तशा प्रकारच्या पतंग उडविण्याच्या धाग्यामुळे होणाऱ्या प्राणघातक इजांपासून पक्षी व मानव जिवितास संरक्षण करण्याची गरज आहे.

तसेच, पतंगासह ते सर्व तुटलेले नायलॉन मांजाच्या धाग्याचे तुकडे जमिनीवर पडतात व सदर नायलॉन मांजाचे तुकडे लवकर विघटन होण्याजोगे नसल्याने गटारे व नदी-नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात, तसेच गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ट असलेले खाद्य सेवन केल्यामुळे त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. अशाप्रकारे सदर धाग्यामधील मांज्यामधील प्लास्टिकच्या वस्तुमुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात.

अशा अपघटन न होऊ शकणाऱ्या प्लास्टिकच्या धाग्याचा अती वापरामुळे विजेच्या तारांवरील घर्षणामुळे होणाऱ्या ठिणग्यांनी लागणाऱ्या आगीमुळे वीजप्रवाह खंडीत होऊन विज केंद्र बंद पडतात.व त्यामुळे इलेक्ट्रिक उपकरणाना बाधा पोहचते, अपघात होतात. वन्यजीवांना धोका पोहचतो तसेच जीवितहाणी होण्याचा असतो. आणि अशा दुर्मिळ व नष्टप्राय होवू घातलेल्या निष्पाप पक्षांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने नुकताच दिलेल्या निकालानुसार पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी (महापालिका/नगरपालिका/ग्रामपंचायत) यांनी संयुक्तपणे नायलॉन विक्रेते यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.वारंवार सांगुनही विक्री करणारे दुकानदार यांचे यांचे आस्थापना परवाना(शाॅप अॅक्ट लायसन्स) रद्द करण्याचे अधिकारही पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहे. तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ चे कलम ५ अन्वये खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.

 प्लॉस्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलाॅन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याचा सणाच्या वेळी करण्यात येतो. त्यामुळे पक्षांना व मानवी जीवितास तीव्र इजा होण्याचा धोका असतो, अशा अविघटनशील नायलॉन मांजामुळे गुरांना/ प्राणी जातीला उदभवणारा धोका होण्याची शक्यता असते. माती व पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरते. त्यामुळे अशा धाग्यांचा वापरावर बंदी घालण्यात यावी. घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदार यांचकडून तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी. ज्यायोगे संपूर्ण वर्षभरात त्यांची साठवणूक हाताळणी व विक्री होणार नाही.

पतंग उडविताना केलेल्या मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारावर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्रे बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवीत हानी होणे. अशा घटना घडण्याची शक्यता असल्याने याबाबतची जनजागृती करण्यात यावी. नायलॉन विक्रेते यांचेवर कारवाई करतांना छुप्या मार्गाने वैयक्तिक पतंगबाजी करण्यासाठी नायलॉन धागा बाळगणारे, तसेच इमारतीच्या टेरेसवर पतंगबाजीत नायलॉन धागा सर्रासपणे वापरतांना आढळून येणाऱ्या इमारतींच्या जागा मालकांवर न्यायालय आणि प्रशासनाने बंदी घातलेल्या नायलॉन धागा वापरण्यास इतरांना प्रोत्साहन दिले म्हणून कारवाई होवू शकते.

या बाबत वरील दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी सर्व संबंधित विभागांनी त्यांचे कार्यक्षेत्रात करावी.कोणताही अनुचित प्रकार वा घटना घडणार नाही काळजी यांची खबरदारी घ्यावी. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नायलॉन बंदी बाबत सार्वजनिक शपथ देण्यात यावी. अनेक वर्षांपासून पतंग उत्सवाचे आनंदी स्वरूप कायम रहावे. या करिता सर्व नागरिकांनी जागरूक राहून मकरसंक्रांतीचा पारंपरिक पतंग उत्सवाचा आनंद टिकवावा, असे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे.