निळवंडे असो की, उजनी चारी उपसा जलसिंच काळे परिवाराशिवाय पर्याय नाही –  बाबुराव थोरात

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : ज्यांच्यामुळे बंद पाडलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना त्यांनीच सुरु करण्याचा अयशस्वी प्रयत्न करून नागरिकांची सहानुभूती मिळविण्याचा खटाटोप केला. मात्र, हि योजना फक्त काळे परिवारच चालवू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून उजनी उपसा जलसिंचन योजनेला काळे परिवाराशिवाय दुसरा पर्यायच नसल्याचे उजनी चारी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी म्हटले आहे.

कोपरगाव मतदार संघाच्या दक्षिण भागातील ११ गावांना वरदान ठरणा-या उजनी चारी उपसा जलसिंचन योजनेला २००४ पूर्वी शासनाकडून नॉट फेजीबल (उपयुक्त नाही) असा शेरा मारण्यात आला होता. परंतु रांजणगाव देशमुख, काकडी,  मनेगाव, वेस-सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके,  शहापूर, बहादराबाद या ११ गावातील नागरिकांसाठी हि योजना किती महत्वाची आहे. याची जाण असणाऱ्या माजी आ. अशोक काळे यांनी २००५ साली विधान सभा अधिवेशनात उजनी चारी उपसा जलसिंचन योजने संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून विद्यमान राज्यपालांकडे जावून या उजनी उपसा जलसिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी अशी मागणी केली होती. 

आ. आशुतोष काळे यांनी या ११ गावासाठी निळवंडेचे पाणी उपलब्ध करून देवून अतिरिक्त दीड टीएमसी पाणी देखील मंजूर करून घेतल्यामुळे पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव तुडुंब भरले आहेत. त्यामुळे निळवंडे असो की, उजनी चारी उपसा जलसिंचन योजना असो काळे परिवाराशिवाय दुसरा पर्यायच नसल्याचे अधोरेखित होत आहे

त्या मागणीची राज्यपाल महोदयांनी दखल घेवून ही मागणी योग्य ठरवत राज्यपालांनी पाटबंधारे खात्याच्या मंत्र्यांना या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना केल्या होत्या. तेव्हापासून २०१४ पर्यंत माजी आ. अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात हि योजना पदरमोड करून अखंडपणे कार्यान्वित ठेवली. मात्र, २०१४ नंतर हि योजना पुन्हा बंद पडल्यामुळे कायमच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या ११ गावातील शेतकऱ्यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या होत्या.

परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करणार असा दिलेला शब्द आ. आशुतोष काळे यांनी निवडून येताच पूर्ण केल्यामुळे या ११ गावातील शेतकऱ्यांचे चेहरे पुन्हा खुलले होते. चालू वर्षी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ओव्हर फ्लोच्या पाण्यावर भवितव्य अवलंबून असलेली हि योजना बंद राहणार होती. मात्र, आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे या योजनेसाठी पाणी उपलब्ध झाले आहे.मात्र, हि योजना सुरु करण्यासाठी या योजनेच्या पंपाच्या दुरुस्ती खर्चाचे बिल भरणे बाकी होते. तसेच इतरही दुरुस्ती खर्च केल्याशिवाय हि योजना सुरु होणार नव्हती.

त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी माजी आ. अशोक काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवत पदरमोड करून पंपाच्या दुरुस्ती खर्चाचा भार सोसल्यामुळे हि उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. यावेळी उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात, लक्ष्मण थोरात, चंद्रकांत पोकळे, गणेश थोरात, नवनाथ पोकळे, अनिल वाणी, गोरक्षनाथ वाकचौरे, शिवाजी थोरात, विलास थोरात आदी उपस्थित होते.