कोपरगाव येथे शिवभक्त भाऊ पाटील यांचे प्रवचन

श्री राम चरित्र कथा सोहळ्याची जय्यत तयारी

कोपरगाव प्रतिनिधी दि.११ : सध्या देशभरात प्रभू रामचंद्रांचा महिमा सुरु आहे. २ जानेवारीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अयोध्या नगरीचे आकर्षण जगाला लागले आहे. त्यामुळे देशवासीयांच्या मनामनात श्रीरामांचे विचार गुणगुणत आहे त्यातच कोपरगाव शहरात राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे एकनिष्ठ शिवभक्त भाऊ पाटील यांच्या सुश्राव्य वाणीतून सलग सात दिवस श्री राम चरित्र चिंतन कथेचे आयोजन करण्यात आले आहे. 

शहरातील मध्यवर्ती तहसील कार्यालय शेजारील मैदानात शुक्रवार, दिनांक १२ जानेवारी २०२४ ते गुरुवार १८ जानेवारी २०२४ या कालावधीत दररोज ७ दिवस सायंकाळी ०७ ते १० वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील शिवभक्त भाऊ पाटील यांच्या प्रवचनाने होणार आहे. कथेचे आयोजन जय जनार्दन भक्त मंडळ  तसेच उद्योजक चांगदेव कातकडे, भाजपचे नेते पराग संधान, उद्योजक मिलनकुमार चव्हाण, राजेश ठोळे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, दीपक कोटमे, मनोज अग्रवाल, विजय कडू, प्रशांत होन, संदीप कोयटे, हिरालाल महानुभाव, माजी नगरसेव दिनार कुदळे यांच्या विषेश सहकार्यातून आयोजित केले आहे. 

या कार्यक्रमाला ब्र.प.पू. स्वामी मधुगिरीजी महाराज, प.पू. स्वामी मठाधिपती रमेशगिरीजी महाराज व प.पू. स्वामी माधवगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती व आशीर्वाद लाभणार आहे. श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व अयोध्यातील प्रभु श्री.  रामचंद्राच्या जन्मभूमीत संपन्न होणाऱ्या श्री राम मंदिर स्थापना समारंभाचे औचित्य साधून श्री राम भक्त व समस्त भाविकांकरिता मर्यादा पुरुषोत्तम श्री राम याच्या दिव्य जीवनावर आधारित श्री राम चरित्र चिंतन कथेचे आयोजन करण्यात येत आहे. तरी सर्वांनी कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.