शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : दैनंदिन जीवनात ज्या भाषेचा वापर जास्त होतो ती भाषा अमर प्रवाही राहते, वक्तृत्व म्हणजे अभिनिवेश न घेता सहज सोप्या तरीही रसाळ आणि रंजक पद्धतीने केलेले प्रबोधन असते, आपल्या संत परंपरेने हीच कला आपल्याला वारसा म्हणून दिली आहे, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी ती जाणीवपूर्वक जोपासायला हवी’, असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते आणि पत्रकार विनोद जैतमहाल यांनी केले.
पद्मभूषण बाळासाहेब भारदे स्मृती राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या (वर्ष ८वे) पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. रमेश भारदे, विश्वस्त हरीश भारदे, सौ. रागिनीताई भारदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर,बीड, राहुरी, संगमनेर, नेवासा येथून मोठ्या संख्येने स्पर्धक उपस्थित होते. या स्पर्धेचा मानाचा स्व.बाळासाहेब भारदे स्मृती करंडक यावर्षी राहुरी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने पटकावला. सातवी ते दहावी या मोठ्या गटात श्रुतिका झेंडे (प्रथम) भार्गवी शिरोळे ( द्वितीय) ज्ञानेश्वरी जाधव( तृतीय) तर नमिता सांगळे, राहुल खराडे व चैताली तूपसैंदर यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त केली.
चौथी ते सहावी या लहान गटात राजेश्वरी जाधव ( प्रथम) ,आराध्या जावळे( द्वितीय), स्वरा दहिफळे ( तृतीय) तर ओम आजबे, प्राची साळुंके, उन्नती कोल्हे यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली.विजेत्यांना पाच हजार रु. तीन हजार व दोन हजार रु रोख व स्मृतिचिन्हे देण्यात आली.
स्पर्धचे परीक्षण प्रा.विनोद जैतमहाल, नाट्यलेखक राजकुमार तांगडे, सुहास सदाव्रते, ऋषीराज दहिफळे, सुनील कटारिया व बाबासाहेब दुर्गे यांनी केले. प्रास्ताविक प्रा.शिवदास सरोदे तर सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले.