अयोध्या सोहळ्यासाठी रामगिरीजी महाराज व रमेशगिरिजी महाराज यांना निमंत्रण हे भाग्याचे क्षण – विवेक कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज हे गुरुवारी (१८ जानेवारी) अयोध्येला रवाना झाले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी प. पू. रमेशगिरी महाराज यांचे संत पूजन करून त्यांना सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. प. पू. रमेशगिरी महाराज विमानाने अयोध्येला रवाना होण्यापूर्वी त्यांच्या सन्मानार्थ संत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमापासून काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य मोटारसायकल रॅलीत विवेक कोल्हे यांनी सहभाग नोंदवला.   

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीत नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पाडणार आहे. यावेळी प्रभू श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातील अनेक साधू, संत, महंत व मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट (अयोध्या) च्या वतीने महाराष्ट्रातून कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरीजी महाराज यांनाही या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प. पू. रमेशगिरी महाराज हे अहमदनगर जिल्ह्यासह कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील साधू, संत व जनतेच्या वतीने प्रतिनिधीत्व करणार आहेत.  

अयोध्या येथे जाण्यासाठी मठाधिपती प. पू. रमेशगिरीजी महाराज यांनी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास  कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमातून काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रस्थान केले. तत्पूर्वी त्यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या समवेत श्री काशी विश्वनाथ व राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनता, संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवाराच्या वतीने विवेक कोल्हे यांनी प. पू. रमेशगिरीजी महाराज यांचे संत पूजन करून वंदन केले व त्यांना सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प. पू. रमेशगिरीजी महाराज यांचे प्रस्थान अयोध्या क्षेत्रात होण्यासाठी काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीत विवेक कोल्हे यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देत निघालेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 

यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, येत्या २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचा उद्घाटन व प्रभू रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील कोट्यवधी रामभक्तांना उत्सुकता आहे. सुमारे पाचशे वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम मंदिर उभारणीचे स्वप्न साकार झाले असून, या नवीन भव्य मंदिरात प्रभू श्री रामचंद्र विराजमान होत आहेत. हा आपल्यासाठी खरोखर भाग्याचा व अभिमानाचा क्षण आहे.

या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरीजी महाराज व श्रीक्षेत्र सराला बेट (गोदावरी धाम) येथील योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थानचे मठाधिपती प. पू. रामगिरीजी महाराज यांना खास निमंत्रण आले आहे. या संत, महंतांना निमंत्रण म्हणजे समस्त कोपरगावकरांना निमंत्रण आहे. याबद्दल समस्त कोपरगावकर, भक्तगण व युवा वर्गाला आनंद झाला आहे. प. पू. रमेशगिरीजी महाराज व प. पू. रामगिरीजी महाराज यांनी अयोध्येतील ऐतिहासिक सोहळ्यात कोपरगावकरांसह समस्त देशवासियांसाठी प्रभू श्रीरामाकडे आशीर्वाद मागावेत,अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी श्री जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलास कोते, विश्वस्त अनिल जाधव, रामकृष्ण कोकाटे, शिवनाथ शिंदे, आशुतोष पानगव्हाणे, संदीप चव्हाण, अतुल शिंदे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्यासह साधू, संत, ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, जय जनार्दन भक्त परिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.