प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंदिरात चैताली काळेंनी केली महाआरती

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३  :- अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत उभारण्यात आलेल्या मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले आहे. कोपरगावच्या पावन भूमीत देखील प्रभू श्रीरामाचे वास्तव्य असल्याचे पौराणिक ग्रंथात सांगितलेले आहे. या विविध ठिकाणी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी होवून महाआरती केली.

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवार (दि.२२) रोजी देशभरात आनंद आणि उत्साहाच्या लहरी पसरल्या होत्या. संपूर्ण देश या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुन्हा एकदा दिवाळी साजरी करत असतांना कोपरगाव तालुक्यात देखील विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात होते. संपूर्ण देश रामाच्या भक्तीत तल्लीन झाला असतांना कोपरगावच्या पावन भूमीत ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे वास्तव्य होते. त्या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

कोपरगावच्या पवित्र भूमीला ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक महत्त्व असून प्रभू श्रीरामाचा वनवास देखील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावापासून सुरू झाल्याची माहिती धार्मिक ग्रंथातून मिळते. तसेच कोपरगावातून वाहनाऱ्या पवित्र गोदावरी नदीचा संपूर्ण परिसर म्हणजे दंडकारण्य होय. याच दंडकारण्यात वनवास भोगत असताना सीता मातेने एका कठीण प्रसंगी कपाळाला कुंकू लावणार नाही अशी शपथ घेवून तालुक्यातील कोकमठाण येथे आपल्या भाळी कुंकू लावले होते.

त्यामुळे त्या जागेला कुमकुमस्थान अर्थात कोकमठाण संबोधले जाऊ लागले. तसेच ज्या हरीण रुपी मारीस राक्षसाचा वध करतांना मारलेल्या बाणाने चास गावातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतील खडकात नळी निर्माण होवून चास गावाची ओळख चासनळी झाली अशा विविध ठिकाणी चैताली काळे यांनी धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होवून पूजन करून उपस्थित श्रीराम भक्तांना प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच कोपरगाव शहरातील हिंदुवाडा तरुण मंडळ, मोदकेश्वर देवस्थान येथील मुंबादेवी तरुण मंडळ व रामलल्ला प्रतिष्ठाण, आनंदनगर, धारणगाव रोड याठिकाणी देखील आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी चैताली काळे यांनी प्रभू श्रीरामांची महाआरती केली व उपस्थित श्रीरामभक्तांना प्रसाद वाटण्याची सेवा केली. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर होत असलेल्या या अभूतपूर्व व ऐतिहासिक प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोपरगावची भूमी देखील यानिमित्ताने संपूर्णपणे श्रीराममय झाली असल्याचे दिसून येत होते.