आमदार काळे यांना फक्त मतांसाठी दलीत समाज पाहिजे का? – दिपक गायकवाड 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ : नुकतेच कोपरगाव शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान व माता रमाई जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्यात मित्रपक्ष म्हणून सत्ता उपभोगणारे आमदार आशुतोष काळे हे कुठेही दिसले नाहीत किंवा त्यांचे कुणीही प्रतिनिधी या ठिकाणी नामदार आठवले साहेब यांच्या स्वागताला हजर नव्हते. त्यामुळे दलीत संघटना किंवा नेते यांचे फोटो आणि चेहरे तुम्हाला फक्त मतांसाठी सोबत लागतात का? असा परखड सवाल आर.पि.आय(आठवले गट) चे प्रदेश सचिव दिपक गायकवाड यांनी आमदार काळे यांना रमाई जयंती निम्मित आयोजित जेऊर कुंभारी येथील कार्यक्रमात जाहीररीत्या केला आहे.

इतर वेळी शासकीय योजना आणि प्रसिद्धीचे माध्यम मिळाले की मगच आमदार व त्यांचे कार्यकर्ते यांना दलीत संघटना आठवतात. काळे यांनी जाणीवपूर्वक अथांग भीमसैनिक हजर असताना सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतीनिधी म्हणून हजर राहणे टाळले आहे का? ते तर नाहीच पण त्यांच्या मागे इतर वेळी हिंडणारा लवाजमा कुठेही चमकला नाही. आमदार काळे निवडून येण्यात आमच्या दलितांची मतेही होती हे ते विसरले आहेत का? सामजाला गृहीत धरून सोयीचे राजकरण करने हा प्रकार त्यांना शोभला नाही.

तालुक्यात कोणीही मंत्री अथवा मान्यवर आल्यानंतर त्यांच्या स्वागताला स्थानिक लोप्रतिनिधींनी हजर असन्याचा संकेत आहे. एरवी दुसऱ्यांचे काम आणि केंद्राचा निधी असतानाही संबंध नसताना केवळ श्रेयासाठी आमदार हजर असतात. या उलट मात्र, जाणीवपूर्वक आमचे दलीत समाजाचे नेते येणार आहेत. म्हणून त्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करण्याची हिम्मत काळे यांनी दाखवली आहे असेच दिसते. या सोयीच्या भूमिकेचे आगामी काळात त्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशारा गायकवाड यांनी शेवटी दिला आहे.