शिर्डी-अयोध्या रेल्वे सुरू करा स्नेहलता कोल्हे यांची रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : देशातील रामभक्तांचे स्थान अयोध्या आणि साई भक्तांचे श्रध्दास्थान शिर्डी अशी तीर्थ यात्रा रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणी कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आ. स्नेहलता कोल्हे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कडे एक पत्रांद्वारे केली आहे.

प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात असे म्हंटले आहे की, देशातील प्रभू श्रीराम राम दर्शनाचे स्वप्न अयोध्या येथील भव्य राम मंदिराने साकार झालेले आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील असंख्य राम भक्तांना रामलल्लाच्या दर्शनाची अभिलाषा आहे. धार्मिक तीर्थामध्ये एकमेव असे शिर्डी तीर्थ आहे. जे उत्तर भारताशी आणि दक्षिण भारताशी रेल्वेच्या माध्यमातून जोडले गेले आहे.

शिर्डीच्या अगदी जवळच्या परिघात नगरसुल, मनमाड असे जंक्शन उपलब्ध आहेत. त्यामुळे दक्षिणात्य भाविकांना साईबाबांचे दर्शन घेऊन आयोध्या दर्शनाची उपलब्धी होऊ शकते. तीर्थक्षेत्र शिर्डी येथे जागतिक स्तरावरील भाविकांचा मोठया प्रमाणात ओघ आहे. साईबाबांच्या पवित्र नगरीत येणाऱ्या हजारो भाविकांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी आयोध्याला जाणारी नवीन स्वतंत्र रेल्वे सुरू झाल्यास दोन्ही जागतिक धार्मिक स्थळे जोडली जाऊन भाविकांची आस्था जोपासणे शक्य होईल. उत्तर भारतीय साईभक्तही यामुळे शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला येऊ शकतात. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभुराम मंदिराचे स्वप्न साकारले असून शिर्डी-कोपरगाव व परीसरातील हजारो-लाखो भाविकांना रामलल्लाच्या पवित्र मंदिरापर्यंत इतर मार्गाने प्रवास करणे खर्चिक व त्रासदायक असल्याने रेल्वेच्या सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्यास रामभक्तीचा आनंद रामभक्तांना घेता येईल. तरी शिर्डी (महाराष्ट्र) ते अयोध्या(उत्तरप्रदेश) अशी नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी संमधीत विभागाला आदेशीत करावी, अशी मागणी कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आ. स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.