सात नंबर अर्ज भरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी द्या – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उन्हाळी आवर्तनातून सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार ७ नंबर पाणी मागणी अर्ज भरलेले आहेत. मात्र पाटबंधारे विभागाने या शेतकऱ्यांना फळबागा वगळता इतर उभ्या पिकांना सिंचनासाठी आवर्तन देण्यात असमर्थतता दर्शविली आहे. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी तातडीने मुंबई गाठत दोनही उपमुख्यमंत्र्यांना भेटून सात नंबर पाणी मागणी अर्ज भरलेल्या सर्व लाभधारक शेतकऱ्यांना सुरु असलेल्या उन्हाळी आवर्तनातून सिंचनासाठी पाणी दयावे अशी आग्रही मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांना निवेदन देवून साकडे घालत त्याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा देखील केली.

यावेळी आ.आशुतोष काळे यांनी दोनही उपमुख्यमंत्र्यांकडे मतदार संघाची दुष्काळी परिस्थिती मांडतांना त्यांनी सांगितले की,गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याच्या आवर्तनातून लाभधारक शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तन देण्यात आले आहे. परंतु सुरु असलेल्या आवर्तनातून पाटबंधारे विभागाने अचानकपणे फक्त फळबागांनाच सिंचनासाठी आवर्तन देण्याचा निर्णय घेतला आहे. हा सातत्याने अन्याय सहन करणाऱ्या गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांवर घोर अन्याय आहे.

या निर्णयामुळे फळबागा जरी वाचणार असल्या तरी बारमाही पिकांचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांच्या अजूनच अडचणी वाढणार आहे. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी चर्चेदरम्यान दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

अचानकपणे केवळ फळबागांना पाणी देण्याचा पाटबंधारे विभागाने निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने घेतलेल्या निर्णयात बदल करून ज्या लाभधारक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या लेखी पत्रकानुसार ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल केले आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांना सुरु असलेल्या उन्हाळी आवर्तनातून त्यांच्या मागणीनुसार फळबागासह सर्वच उभ्या पिकांना सिंचनासाठी पाणी देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला द्याव्यात असे साकडे आ.आशुतोष काळे यांनी दोनही उपमुख्यमंत्र्यांना घातले आहे.