कोपरगांव प्रतिनिधी, दि. ९ : दारिद्र्य, पाप आणि अज्ञान यामुळे माणूस नेहमीच दुःखी राहतो. मात्र कष्टाने दारिद्र्, सत्कर्माने पाप आणि ज्ञानाने अज्ञान धुवून टाकले की, माणूस सुखी होतो. असे विचार ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांनी संवत्सर येथे आयोजित किर्तनाद्वारे व्यक्त केले. संवत्सर येथे ऋषीपंचमीनिमित्त गोदावरीच्या काठावरील श्री शृंगऋषींच्या मंदिराजवळ महिलांनी स्नानांची पर्वणी साधली. यानिमित्त श्री शनी महाराज मंदिराच्या प्रांगणात ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते.
दिवंगत लोकनेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आमदार आशुतोष काळे, कृष्णराव परजणे, श्रीमती देऊबाई परजणे, उपसरपंच विवेक परजणे, सरपंच सौ. सुलोचना ढेपले , बबनराव मते यांच्यासह अनेक मान्यवरांनी व संत महंतांनी याप्रसंगी भेट देऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला. तर प्रारंभी गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी ग्रामस्थंच्यावतीने ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांचा सत्कार करुन उपस्थितांचे स्वागत केले.
विश्वातले सर्व ज्ञान हे माणसासाठी आहे. परंतु या ज्ञानापासून माणूस वंचित आहे. चांगली जीवनमूल्ये, चांगली गुणधर्मे, चांगले विचार यापासून माणूस दूर जाताना दिसतो. त्यामुळे मानवी जीवन हे दैवी जीवन बनण्याऐवजी आसुरी जीवन बनत चालले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नेहमी चांगल्या माणसांच्या सहवासात आले पाहिजे. उत्तम जीवन जगणारी माणसे सद्विचारी असतात तर जीवनमूल्ये हरवून बसणारी माणसे मात्र जगण्याची व्यर्थ धडपड करीत असतात.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, उद्योग अशा विविध क्षेत्रात माणूस मोठा होतो पण त्या मोठेपणाला समाजमान्यता असेलच असे नाही. सत्कर्मातून मिळालेले मोठेपण आनंददायी असते असे सांगून मीराबाई यांनी सद्याच्या धावपळीच्या युगात परस्परांविषयीचा आदरभाव माणूस विसरत चालला असून अहंभाव मात्र फोफावत चालला असल्याची खंत व्यक्त केली. प्रत्येकाने मनातला अहंभाव दूर करण्यासाठी मनाची कवाडे उघडी ठेवायला हवीत. संस्काराची शिदोरी, विचारचे धन जोडता आले तर जीवन धन्य होईल असेही मार्गदर्शन ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांनी केले.
परमपूज्य नामदेवराव परजणे आण्णांसारखी मोठ्या मनाची माणसे आजच्या पिढीला प्रेरणा देणारी आहेत. त्या प्रेरणेतून समाज घडावा, विश्वबंधुत्वाची भावना प्रत्येकांमध्ये निर्माण व्हावी असे मार्गदर्शन करुन मीराबाई मिरीकर यांनी ऋषीपंचमीचे महत्व व या दिवशी महिलांनी आचरण करावयाचे व्रत याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेली अनेक वर्षापासूनची ही परंपरा युगानुयुगे चालणार असून गोदावरीच्या काठावरील हा आध्यात्मिक यज्ञ अखंडपणे तेवत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी नदीत स्नानाची पर्वणी साध्य करण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केलेली होती. समाधानकारक पावसामुळे यंदा नदीला दुथडी भरुन पाणी वाहत असल्यामुळे संपूर्ण गोदाकाठ भक्तीमय झालेला होता. संवत्सरला श्री क्षेत्र पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यातच मीराबाई मिरीकर यांच्या सुश्राव्य किर्तन श्रवणाचा लाभ मिळत असल्याने औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर अशा विविध ठिकाणावरुन महिलांसह भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी किर्तन श्रवणासह महाप्रसादाचा लाभ घेतला.