कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : जेव्हापासून आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांची उमेदवारी जाहीर केली त्या धक्क्यातून आजवर न सावरलेल्या विरोधकांनी समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून निवडणूक हातातून चालल्यामुळे आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली असल्याची टीका कोल्हे यांचे नाव न घेता समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी केली आहे.

कोपरगाव तालुक्यातील वारी येथील रहिवासी असलेले समता पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब दत्तात्रय ठोंबरे सोमवार (दि.१५) रोजी सकाळी वारीवरून कोपरगावकडे येत असतांना कोपरगाव शहरातील बेट नाक्याजवळ विरोधी कोल्हे गटाच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी त्यांची दुचाकी अडवून तू काका कोयटे यांचे सोशल मिडीया पेज चालवतो का? अशी विचारणा केली.

त्यावेळी कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे यांनी नाही असे उत्तर दिले असता आमच्याकडे पुरावे आहेत तू खोटे बोलतो असे सांगत कपडे फाटेपर्यंत जबर मारहाण करण्याची घटना घडली असून त्यांना जखमी अवस्थेत कोपरगाव खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती समजताच समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात जावून जखमी कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे यांची भेट घेवून त्यांच्याकडून घडलेल्या घटनाक्रमाची माहिती जाणून घेतली.

त्यानंतर संदीप कोयटे यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहीती देतांना सांगितले की, कोपरगाव शहरात विरोधी पक्षाकडून यापूर्वीच व्यापारी बांधवांना धमकावण्यात आले. समता पतसंस्थेबाबत चुकीची माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविण्यात आली. आता तर समताच्या कर्मचाऱ्यांना जीव घेणी मारहाण करण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली आहे त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत होणाऱ्या पराभवाची विरोधकांनी किती धास्ती घेतली आहे हे दिसून येत आहे.

निवडणूक शांततेत पार पाडली जावी अशी कोपरगावकरांची इच्छा आहे, मात्र शांततेच्या वातावरणात सुरु असलेली निवडणूक विरोधकांनी दहशतीकडे वळवली आहे. समताचा एक साधा कर्मचारी पोटाची भूख भागवण्यासाठी समतामध्ये कामाला येतो त्या कर्मचाऱ्याला विरोधक धमकावून मारहाण करून दहशत निर्माण करणार असतील तर २० तारखेला मतदानाच्या माध्यमातून कोपरगावकर चोख उत्तर देईल.

व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करून कर्मचाऱ्यांना मारहाण व समताबाबत सोशल मिडीयावर बदनामी कारक मजकूर टाकायचे काम विरोधकांकडून सुरु आहे. सुरु असलेले प्रकार थांबविण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. समता बाबत सोशल मिडीयावर बदनामी कारक मजकूर टाकल्याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुरुवार (दि.११) रोजी लेखी तक्रार दिलेली असून आजपर्यंत आमची तक्रार नोंदवून घेतलेली नाही एवढी विरोधकांनी आपली दहशत निर्माण केलेली आहे.

समता पतसंस्थेबाबत सोशल मिडीयावर बदनामीकारक मजकूर टाकणाऱ्या माणसाचा शोधच लागत नसल्याचे पोलीस प्रशासन मागील चार दिवसांपासून आम्हाला सांगत असले तरी प्रगत टेक्नोलॉजीच्या युगात चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या मोबाईल नंबरचा शोध लागत नसेल तर पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करीत आहे हे कोपरगावकरांना चांगलेच माहित आहे.

या मारहाणीच्या घटनेचीही पोलीस प्रशासन तक्रार करून घेणार की नाही याबाबतही साशंकता आहे. हि एक मोठी शक्ती असून त्या महाशक्तीपुढे आम्ही कधीच पुरे पडणार नाही. आम्ही व्यापारी माणसं आहोत आम्ही दहशतीला दहशतीच्या माध्यमातून उत्तर देऊ शकत नाही. परंतु जनताच त्यांना आता उत्तर देणार आहे. मात्र आम्हाला आमचा जीव वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनचा आश्रय घेवून पोलीस स्टेशनला येवून बसावे लागणार असल्याचे सांगत संदीप कोयटे यांनी पोलीस प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.


