कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ एप्रिल २०२६ : निधी मिळवण्यात काडीचा संबंध नसतांना आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आणलेल्या निधीतील कामाचे भूमिपूजन करायचे व ज्यांनी जागा दिली त्यांनाच गुंडाकरवी धक्काबुक्की करायची हा सत्तेचा उन्माद असून त्याचा निषेध करण्यासाठी बुधवार (दि.२२) रोजी झालेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून बहिष्कार टाकण्यात आला.

रविवार (दि.१९) रोजी कोपरगाव शहरातील सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, सभामंडप व सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी सत्ताधारी कोल्हे गटाकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना गुंडाकरवी धक्काबुक्की करण्यात आली आणि विशेष म्हणजे ज्यांनी श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सभामंडपासाठी जागा दिली ते माजी नगरसेविका यांचे पती व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब आढाव यांनाच गुंडाकरवी धक्काबुक्की करण्यात आली होती.

त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत गौतम बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद घेवून नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून बहिष्कार टाकण्याचे जाहीरपणे सांगत सत्ताधाऱ्यांनी गुंडाकरवी केलेल्या धक्काबुक्कीचा निषेध केला.

यावेळी गटनेत्या गौरी पहाडे यांनी सांगितले की, आमचे मार्गदर्शक आमदार आशुतोष काळे यांनी नेहमीच कोपरगाव शहराच्या विकासाला प्राधान्य दिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हा सर्व नगरसेवकांचा बुधवार (दि.२२) रोजीच्या सर्वसाधारण सभेतील शहर विकासाच्या सर्व विषयांना आमचा पाठींबा आहे आणि यापुढेही राहणार आहे. मात्र कोपरगावकरांना त्रास देवून शहराची शांतता भंग करणाऱ्या कोणत्याच विषयाला आमचा पाठींबा राहणार नाही. सत्ताधाऱ्यांनी श्रेयवादासाठी वाद घालण्यापेक्षा विकास कामांना महत्व द्यावे.

आमदार आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नातून कित्येक वर्षांचा पाणी प्रश्न सुटला असून पाणी प्रश्नाबरोबरच मागील सहा वर्षात कोपरगाव शहराच्या झालेल्या विकासामुळे सर्व नगरसेवक व नगरपरीषद प्रशासनाकडून जनतेच्या शहरविकासाच्या अपेक्षा आहेत. मात्र नागरिकांच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण होतांना दिसत नाही त्यामुळे विकासाऐवजी श्रेय घेण्यासाठी गुंडगिरीला प्राधान्य देणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध करीत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुनील गंगुले यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे ५ नंबर साठवण तलावाचे कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे त्याप्रमाणे कोपरगाव नगरपरिषदेने एक ते चार साठवण तलावाच्या दुरुस्ती ऐवजी चारही साठवण तलावाचे कॉंक्रीटीकरण करावे अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनीकोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिल्या असून त्यासाठी निधी मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत मात्र विरोधकांकडून त्याबाबत अपप्रचार केला जात आहे.

सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हेसत्ताधाऱ्यांकडून शिकण्यासारखे आहे.ज्यावेळी त्यांच्याकडे बहुमत होते त्यावेळी ५ नंबर साठवण तलावाला विरोध केला व २८ विकासकामांना विरोध करून ह्या कामांना न्यायालयातून स्थगिती आणली. आता सत्ता मिळाली तर त्या सत्तेचा उपयोग गुंडागर्दी करण्यासाठी केला जात आहे. आमदार आशुतोष काळे कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी आणत आहे तुम्हाला सत्ता मिळाली तुम्ही पण निधी आणायचा प्रयत्न करा अशा सर्वसामान्य कोपरगावकरांच्या अपेक्षा आहेत.

मात्र निधी आमदार आशुतोष काळेंचा, त्याच निधीतील कामाचे भूमिपूजन, उद्घाटन करायचे आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांना गुंडाकरवी धक्काबुक्की करायची. त्यावेळी त्यांच्या नेत्याने त्यांच्या गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्याला समज देणे गरजेचे होते. परंतु बोलायचे एक आणि करायचे एक अशा पद्धतीचे राजकारण विरोधक करीत असून त्यांच्याकडून कोपरगावकर विकासाच्या काय अपेक्षा करणार असा सवाल सुनील गंगुले यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. परंतु बुधवार (दि.२२) रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. सत्ताधारी जर शहरविकासाचे निर्णय घेत असतील तर पत्रकारांच्या माध्यमातून ते जनहिताचे निर्णय निश्चितपणे जनतेपर्यंत पोहोचणार आहे. मात्र आतल्या गोष्टी पत्रकारांना आणि पत्रकारांमार्फत जनतेला समजू नये यासाठी सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारला जातो का? किंवा हि देखील सत्तेची गुर्मी आहे का? याचे सत्ताधाऱ्यांनी उत्तर जनतेला दिले पाहिजे. आणि सर्वसाधारण सभेत पत्रकारांना का प्रवेश दिला जात नाही याचा जाब कोपरगावकरांनी सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे. – नगरसेवक मेहमूद सय्यद


