आमदार काळेंच्या सूचनेनुसार मालमत्तांचे फेर सर्व्हे करणार – मुख्याधिकारी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या अवास्तव करवाढी संदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी असून ज्या नागरिकांनी या अवास्तव व अन्यायकारक करवाढी बाबत हरकती घेतल्या आहेत व ज्या नागरिकांना काही कारणास्तव हरकती घेता येत नसेल मात्र त्यांच्या हरकती आहेत अशा सर्व नागरिकांच्या मालमत्तेचे फेरसर्वेक्षण करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.

   कोपरगाव नगरपरिषदेने अवास्तव करवाढ केल्यामुळे शहरवासीयांपुढे आर्थिक अडचणीचे संकट निर्माण झाले आहे त्याबाबत अनेक नागरिकांच्या हरकती आहेत. याबाबत आ. आशुतोष काळे यांनी गुरुवार (दि.१५) रोजी कोपरगाव संपर्क कार्यालयात  मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या समवेत बैठक घेवून नागरिकांशी चर्चा केली. त्यावेळी नागरिकांमध्ये मांडलेल्या तक्रारीवरून त्यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

आमदार काळे पुढे म्हणाले की, वार्षिक भाडे मूल्य व भांडवली मूल्यावर मालमत्ता कर आकारणी केली जाते. भांडवली मूल्यावर कर आकारणी राज्यात फक्त अंबरनाथ महानगरपालिका बदलापूर, सावदा व कोपरगाव नगरपालिका यांनीच भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी केली आहे. त्याबाबत २०१६ साली निर्णय घेवून आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला मालमत्ता सर्वेक्षणाचे काम दिले होते. त्या कंपनीच्या सर्व्हेनुसार कोपरगाव शहरांमध्ये वितरित करण्यात आलेल्या कर आकारणीच्या पावत्या पाहून या कंपनीने सदोष काम केल्याचे दिसून येत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

घराचा आकार त्याचे आयुर्मान व एकूण जमिनीचे क्षेत्रफळ याची आकडेवारी चुकीची धरण्यात आल्यामुळे मालमत्ता करात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत असून कोपरगाव नगरपरिषदेने काळजी घेऊन नागरिकांचा विचार करून ढोबळ मनाने कर आकारणी करू नये. ५०० स्क्वेअर फुट क्षेत्रफळ असलेल्या मालमत्तेवर नगरपरिषदेने पहिल्यांदाच कर आकारणी केलेली आहे यापूर्वी कधीही भांडवली मूल्यावर त्यांच्याकडून कर आकारणी केलेली नाही व तसा ठराव देखील घेतलेला नाही. यामध्ये जवळपास साडेसहा हजार मालमत्ता धारक गोरगरीब हातावर काम करणारे मजूर आहेत हा मालमत्ता कर नगरपरिषदेने रद्द करावा.

सर्वे केलेल्या कंपनीने ए.बी.सी.डी. अशा वर्गवारीत मालमत्ता कराचे कर आकारणी केली आहे. यामध्ये ए आर.सी.सी., बी लोड बेरिंग, सी अर्धे पक्के बांधकाम व डी मध्ये कच्चे बांधकाम अशी वर्गवारी केली असली तरी अनेक मालमत्ता डी वर्गात असताना त्यांना सी वर्गाची कर आकारणी तर काही मालमत्ता सी मध्ये असतांना  त्यांना ए वर्गाची कर आकारणी केली आहे. याबाबत कोपरगाव नगर परिषदेने खातरजमा करून घ्यावी व नंतरच माफक कर आकारणी करावी. जीवघेण्या कोरोना महामारीतून कसेबसे बाहेर पडलेले नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करीत असतांना नगरपरिषदेने केलेली करवाढ चुकीची व अन्यायकारक असल्याचे नागरिकांनी बैठकीत मांडलेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे.

त्यामुळे खाजगी एजन्सीने केलेल्या सर्व्हेच्या आधारे नगरपरिषदेने केलेली करवाढ चुकीची असल्याचे म्हणण्यास मोठा वाव आहे. त्यामुळे ज्या नागरिकांच्या या वाढीव कराबाबत हरकती असतील त्यासाठी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर मदत केंद्र देखील सुरु करण्यात आले आहे. त्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या हरकती नोंदवाव्यात. जेवढ्या नागरिकांच्या हरकती येतील व ज्या नागरिकांना काही कारणास्तव हरकती घेता येत नसेल मात्र त्यांच्या हरकती आहेत अशा सर्व नागरिकांच्या मालमत्तेचे नगरपरिषदेने फेरसर्व्हे करून माफक कर आकारणी करावी अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या. मी कोपरगावकरांवर अन्याय होवू देणार नाही अशी ग्वाही देवून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेवू व हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळप्रसंगी कोपरगावकरांसाठी न्यायालयात देखील जावू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

आ. आशुतोष काळे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत अनेक नागरिकांनी कर आकारणी बाबत हरकती असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी ज्या नागरिकांच्या कर आकारणी बाबत हरकती आहेत त्या नागरिकांच्या मालमत्तेचे फेर सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या सूचनेनुसार ज्या नागरिकांच्या हरकती येतील व ज्या नागरिकांना काही कारणास्तव हरकती घेता येत नसेल मात्र त्यांच्या हरकती आहेत अशा सर्व नागरिकांच्या मालमत्तेचे फेर सर्वेक्षण करून माफक कर आकारणी करू – मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, संदीप पगारे, सौ.प्रतिभा शिलेदार, फकीर कुरेशी, रमेश गवळी, महिला जिल्हा सचिव सौ. रेखा जगताप, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाल, सुधीर डागा, डॉ.अजय गर्जे, अॅड. शंतनु धोर्डे, अॅड. विद्यासागर शिंदे, मनोहर कृष्णाणी, आदिनाथ ढाकणे, डॉ. तुषार गलांडे, डॉ. राजेंद्र चिने, डॉ. आतिष काळे,चंद्रशेखर म्हस्के, राहुल देवळालीकर, जावेद शेख, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरनार, अशोक आव्हाटे, भरत मोरे, प्रफुल्ल शिंगाडे, वाल्मिक लहिरे, 

संदीप कपिले, इम्तियाज अत्तार, प्रशांत वाबळे, सुरेंद्र जाधव, कार्तिक नाईक, आकाश डागा, एकनाथ गंगूले, ऋषीकेश खैरनार, लासनकर, राजेंद्र वलझाडे, शुभम लासुरे, अंबादास वडांगळे, महेश उदावंत, मनोज कडू, मनोज नरोडे, शैलेश साबळे, सचिन गवारे, किशोर डोखे, राजेंद्र आभाळे, चंद्रकांत धोत्रे, विलास आढाव, विक्रम मांढरे, निलेश पाखरे, सोमनाथ आढाव, राजेंद्र जोशी, चांदभाई पठाण, अजित कसाब, भाऊसाहेब भाबड, राजेंद्र फुलफगर, राजेंद्र राऊत, दिनेश संत, गोरख वैद्य, गणेश बोरुडे, मयूर शिंदे, बाळासाहेब पवार, नामदेव मोरे, प्रदीप मते, 

हारुण शेख, कैलास मंजुळ, संतोष दळवी, युसूफ शेख, रोहित खडांगळे, रविंद्र देवरे, नारायण लांडगे, शिवाजी कुऱ्हाडे, विजय पाटोळे, जुनेद शेख, आकाश गायकवाड, मनीष फुलफगर, गुलशन होडे, बाळासाहेब बोरसे, विजय शिंदे, सुनील बोरा, सुनील फंड, राजेंद्र हाबडे, महेंद्र टोरपे, सतीश खरात, परेश उदावंत, भाग्यश्रीबोरुडे, दिक्षा उनवणे, सविता कापडी, शितल लोंढे, राखी बोर्डे, सविता भोसले आदींसह व्यापारी व नागरिक उपस्थित होते.