गोदावरी कालवे रब्बी हंगाम पाटपाणी अर्ज भरण्यास ३० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ – कोल्हे 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : गोदावरी कालवे रब्बी हंगाम पाटपाणी नियोजनासाठी नमुना नंबर ७ पाणी मागणी अर्ज ३० डिसेंबर पर्यंत भरून द्यावे असे जाहिर प्रकटन नाशिक पाटबंधारे विभागाने प्रसिध्द केले असुन जास्तीत जास्त शेतक-यांनी मुदतीत पाणी मागणी अर्ज भरावेत असे आवाहन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे. 

           बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांची सध्या रब्बी हंगामासाठीच्या शेती मशागतीची कामे सुरू असल्याने नाशिक पाटबंधारे विभागाने नमुना नंबर ७ वर पाणी मागणी अर्ज ३० नोव्हेंबर पर्यंत सादर करावे म्हणून प्रकटन प्रसिध्द केले होते त्यास मुदतवाढ मिळावी म्हणून आपण पत्रान्वये मागणी केली होती त्यास कार्यकारी अभियंता सागर शिंदे व उपकार्यकारी अभियंता सु. का. मिसाळ यांनी ३० डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली असुन त्याबाबतचे पत्र गोदावरी उजवा व डावा कालवा उपविभाग व शाखा कार्यालयांना पाठविले आहे.

तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेवुन नमुना नंबर ७ वर पाणी मागणी नोंदवावी. गोदावरी कालवे सल्लागार समितीची बैठक निश्चित करून बारमाही गोदावरी कालवे सिंचन पाटपाणी आर्वतनांत येणा-या अडचणी दुर कराव्यात याबाबतही कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्याशी चर्चा केली असल्याचे सौ. कोल्हे शेवटी म्हणाल्या.