कृषी योजना कागदावर न दाखवता बळीराजा पर्यंत पोहचवा – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : आपला तालुका दुष्काळी आहे. याचे भान ठेवून कृषी खात्याने शासनाच्या विविध योजना कशा   ‘छान छान’ आहेत हे फक्त कागदावर दाखवू नये. प्रत्यक्षात त्या योजना ज्यांच्यासाठी आहेत त्या बळीराजापर्यंत पोहोचविल्या पाहिजेत. यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत.

त्यासाठी कर्मचारी व अधिकार्‍यावर कारवाईची वेळ आणू नये, अशी जाणीव करून देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांच्या आत्महत्या रोखल्या जाव्यात. यासाठी आपण काम करावे असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी येथे केले. पंचायत समितीच्या घुले पाटील सभागृहात आज सोमवारी खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक आमदार राजळे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.

आमदार राजळे म्हणाल्या, ठिबक सिंचन, अस्तरीकरण अशा शेतक-यांसाठी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना पुनः सुरु करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्याचा  जास्तीत जास्त लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांना  मिळाला पाहिजे. तसेच जलयुक्त शिवार योजनेत तालुक्यातील १० गावाचा नव्याने समावेश करण्यात आला असून त्या योजने अंतर्गत विविध कामांचा आराखडा शिवार फेरीतून कृषी विभागाने तयार करावा.

       केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या दहिगावने कृषी विज्ञान  केंद्राचे कार्यक्षेत्र जिल्ह्यातील सात तालुक्याचे आहे. तेथील शास्त्रज्ञांनी त्या दृष्टीने अन्य तालुक्यात देखील आपला संपर्क वाढवावा. शेतकऱ्यांसाठी विशेषतः महिलांसाठी शॉर्ट कोर्सेस करावेत. सध्या महिला बचत गट  वाढताहेत. शेती व्यवसायात महिलांचे योगदान पुरुषांच्या तोलामोलाचे आहे त्यांच्यासाठी विशेष उद्बोधनाचे कार्यक्रम घ्यावेत.

      येथे प्रगतीशील शेतकर्यांचा सन्मान केला तो धागा पकडून त्या म्हणाल्या सन्मान घेणार्‍यात महिला होत्या. शेतीला चांगले दिवस आल्याचा संदेश त्यातून मिळतो. असे सांगून करोना काळात दुर्लक्षित शेती सहली सुरू करण्याचा मनोदय त्यांनी शेवटी व्यक्त केला.

     मागील वर्षी पार पडलेल्या पीक स्पर्धेत ढोर जळगावने येथील अलका बळीराम लांडे यांनी प्रति हेक्टरी ३२ क्विंटल बाजरीचे उत्पादन घेतले. आव्हाने येथील पुंडलिक काकडे यांनी प्रति हेक्‍टरी ३५ क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले. तसेच  रावतळे येथील प्रगतिशील शेतकरी आप्पासाहेब रहाटळ यांनी ८४ टन द्राक्षाची निर्यात केली. याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.      

यावेळी  गट विकास अधिकारी महेश डोके, उपविभागीय कृषी अधिकारी पांडुरंग साळवे ,उप अभियंता रमेश शिदोरे, बापू पाटेकर, ताराचंद लोढे , मंचावर होते.  दता फुंदे,  जगदीश धूत, ज्ञानेश्वर शिंदे, सं .दिप जावळे, बंडू सागडे, उमेश भालसिग, शिवाजी भिसे. यांच्यासह अनेकांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यात भालसिंग व भिसे यांनी तालुका कृषी कार्यालयाच्या कार्य पद्धतीवर सडकून टीका करून सर्वांचे लक्ष वेधले.

        यावेळी डॉ. कौशिक, उप विभागीय कृषी अधिकारी पांडूरंग साळवे यांची ही भाषणे झाली. तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी यंदाच्या २३ – २४  च्या खरीप हंगामाचा चित्रफिती द्वारे आढावा मांडला.  यंदाच्या खरीप हंगामासाठी ५९ हजार ८३४ हेक्टरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी  १८ हजार ३१९ मॅट्रिक टन खताची मागणी  नोंदविण्यात आली आहे. मंडल कृषी अधिकारी गणेश वाघ यांनी सुत्रसंचलन केले तर कानिफ मरकड यांनी आभार मानले.